आज १५ ऑगस्ट, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहेत. या स्वातंत्र्य लढ्यासाठी बऱ्याच लोकांनी खूप काही केले. यामध्ये माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. बॉलिवूडमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित ‘सरदार’ नावाचा चित्रपट आला होता. यात अभिनेते परेश रावल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती. १९९३ साली ‘सरदार’या चित्रपटात साकारलेली त्यांची सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. तसेच परेश यांना देखील ही भूमिका खूप जवळची आहे असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान होते. त्यांचे भारताच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांची भूमिका साकारलेला अभिनेता परेश रावल यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कामगिरी विषयी सांगितले की, “आज आपल्या देशाची परिस्थिती पाहिल्यावर मला दररोज त्यांची आठवण येते. ते जर पंतप्रधान असते तर आज देशातील परिस्थिति वेगळी असती. अजूनही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या त्यागाला लोक समजत नाहीत किंवा त्याची कदर करत नाहीत”.

सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारत असताना त्यांना खुप काही शिकायला मिळाले असे परेश रावल यांनी सांगितले. त्यांच्यामुळे एक नवीन इतिहास, एक नवीन लिगसी समोर आली. या भूमिकेमुळे मला मी कोण आहे, माझा देशासाठी काय सहभाग आहे हे मला समजले. आपला खरा इतिहास प्रकाशात आला नव्हता किंवा त्याचा खरा अर्थ कोणाला माहिती नव्हता. मात्र सोशल मीडियाच्या युगात हे सगळं बदलत आहे. खरा अर्थ लोकांपर्यंत पोहचतं आहे. त्यामुळेच आता जबाबदारी मात्र वाढली आहे. असे त्यांनी त्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

‘हम साथ साथ है’ असे म्हणत परेश म्हणाले की, “आजवर भारतावर बरेच हल्ले झाले. मात्र आपण एकजुटीने सामना केल्यामुळे आपले कोणी काही नुकसान करू शकले नाही. त्यामुळे आजही भारत कणखर पणे उभा आहे.” असे परेश रावल यांनी मुलाखतीत सांगितले आहे. परेश रावल हे ‘तूफान’ आणि ‘हंगामा २’ या दोन चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. दोन्ही चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.