गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणून ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेला ओळखले जाते. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. या मालिकेतील ‘शेवंता’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ च्या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली. अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी अभिनेत्री म्हणून अपूर्वाने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात ‘शेवंता’ हे पात्र सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरले होते.
हेही वाचा : वच्छी परत येतेय; ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये नवे वळण
त्यानंतर तिसऱ्या पर्वातही ‘शेवंता’ची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. मात्र आता लवकरच ‘शेवंता’ म्हणजेच अपूर्वा ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा समोर येत आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
अपूर्वा ही मालिका सोडणार की नाही? याबाबत तिने स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच ती ही मालिका नेमकी का सोडणार याचेही कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे ती खरच ही मालिका सोडणार आहे की नाही? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान अपूर्वा नेमळेकरच्या जागी आता अभिनेत्री कृतिका तुळसकर ही ‘शेवतां’ची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा : ‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंताचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान सध्या या मालिकेत प्रेक्षकांचे आणखी एका आवडत्या पात्राची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत वच्छी हे पात्र साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील ही सध्या अगदी नव्या लूकमध्ये दिसत आहे. तिच्या हातात काठी, डोक्यावर पांढरा टिळा आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या दिसत आहेत. तिचे पांढरे झालेले केस, पांढऱ्या रंगाची साडी हा लूक पाहून प्रेक्षकही फार भारावले आहेत. अनेकजण तिच्या या नव्या लूकचं कौतुक करताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागातच प्रेक्षकांना वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे अपूर्वा ही मालिका सोडणार असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.