Marathi Actor Ajinkya Raut : अभिनेता तुषार घाडीगावकरने शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. काम मिळत नसल्यामुळे नैराश्याच्या भरात तुषारने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात अनेक मराठी कलाकारांनी पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. अशातच मराठी कलाविश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत मराठी इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

लोकप्रिय अभिनेता अजिंक्य राऊतने पोस्ट शेअर करत, “एकतर कलाकारांना काम मिळत नाही आणि जेव्हा काम मिळतं तेव्हा काही निर्माते मानधन देत नाहीत” असं म्हटलं आहे. तसेच यावर कठोर नियम केले पाहिजेत अशी मागणीही अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये केली आहे.

अभिनेता म्हणाला, “कलाकार म्हणून मनोरंजन विश्वात काम करणं, टिकून राहणं, बॅक टू बॅक काम करणं… हे खूप जास्त कठीण आहे. काम मिळत नाही म्हणून एखाद्या कलाकाराने आत्महत्या केली अशा गोष्टी जेव्हा कानावर येतात तेव्हा खरंच जीव हळहळतो. याशिवाय काही कलाकारांना काम मिळतं, ते मनापासून, दिवसरात्र मेहनत घेऊन आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम करतात. माझं स्वत:चं उदाहरण द्यायचं झालं, तर मी इंजिनिअर असून या फिल्डमध्ये स्वेच्छेने काम करतोय. पण, इतकं काम करून निर्माते पैसे देत नाहीत…९ लाखांहून अधिक रक्कम आहे जी मला निर्मात्यांकडून मिळालेली नाही. माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुलासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.”

अजिंक्य राऊत पुढे म्हणाला, “एखाद्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेईपर्यंत वाट पाहू नये. यावर कोणीतरी काहीतरी नियम आणावेत. आता काम कोणी मिळवून देऊ शकत नाही. तर, निदान ज्या कलाकारांनी मेहनत घेऊन कामं केली आहेत त्यांना पैसे तरी परत द्यावेत. यासाठी ठोस नियम आले पाहिजेत. कृपया जागे व्हा आणि निदान काम केलेल्या लोकांचे पैसे तरी द्या… आत्महत्या हा पर्याय नाहीये. पण, प्रत्येकाची परिस्थिती ज्याला त्याला माहिती असते. त्यामुळे प्लीज केलेल्या कामाचे आम्हा कलाकारांना पैसे तरी वेळेत द्या. राम कृष्ण हरी.”

“माझं ९ लाखांहून अधिक मानधन निर्मात्यांनी अद्याप दिलेलं नाहीये. कृपया, एखादा कलाकार आत्महत्या करण्याचा विचार करण्यास भाग पडेल..त्या क्षणाची वाट पाहू नका आणि वेळेत पैसे द्या. एखादा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर निर्माते कलाकारांना कमिटमेंटनुसार मानधन सुद्धा देत नाही. माझे ९ लाखांहून अधिक पैसे अजून मिळालेले नाहीत. (प्रोडक्शनने अद्याप दिलेले नाहीत) मुंबईसारख्या मोठ्या शहरात टिकून राहण्यासाठी ही एक मोठी रक्कम आहे. यासाठी काही महत्त्वाचे निर्णय आणि कठोर नियम करणं आवश्यक आहे.” असं अभिनेता अजिंक्य राऊतने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अजिंक्य राऊतच्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे. अजिंक्यच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला.