Lagnanantar Hoilach Prem Serial Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. काव्याने जीवा आणि तिचं नातं आता कायमस्वरुपी संपवून टाकलेलं आहे. “यापुढे तू माझ्यासाठी केवळ ताईचा नवरा आहेस” असं ती जीवाला ठामपणे सांगते. यामुळे जीवा सुद्धा काहीसा दुखावतो. या सगळ्या भांडणाचा राग नकळतपणे नंदिनीवर निघतो.
जीवाच्या तिरसट बोलण्यामुळे नंदिनी प्रचंड दुखावते आणि म्हणते, “मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे.” मात्र, आता हळुहळू जीवाला देखील नंदिनीच्या प्रेमाची जाणीव होत आहे. आता भविष्यात या दोघांचं नातं कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जीवाच्या सतत तिरसट वागण्यामुळे, काव्याच्या असमजूतदारपणामुळे आता मानिनीच्या ( जीवा-पार्थची आई ) मनात देखील संशयाचं जाळं निर्माण झालं आहे. काव्या, जीवा आणि नंदिनी हे तिघंही मिळून नक्की काहीतरी लपवत आहेत याची खात्री मानिनीला होते, त्यामुळे आता इथून पुढे मानिनीचं या तिघांवर बारीक लक्ष असणार आहे.
या सगळ्यात आता देशमुखांच्या घरात आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे सतत चिडचिड करणारी काव्या अखेर घटस्फोटाचा निर्णय घेणार आहे. ती पार्थपासून वेगळं होण्याचा निर्णय घेते, यासाठी वकिलाला फोन करून घरी बोलावून घेते. पण, हा वकील नेमका पार्थच्या संपर्कातील असतो. काव्या वकिलाला जेव्हा घरचा पत्ता सांगते, तेव्हा पार्थला संशय येतो आणि तो वकिलाच्या मागोमाग घरी येतो.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये काव्या दार उघडून वकिलाला घरात घेत असल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर लगेच दारात पार्थची एन्ट्री होते. नवऱ्याला पाहताच काव्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण, घटस्फोटाचं मोठं सत्य आता पार्थसमोर उघड झालेलं आहे.
आता पार्थ आणि काव्याचं नातं कोणतं वळण घेणार? हे दोघं घटस्फोट घेणार की एकत्र राहणार? दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये नेमका काय ट्विस्ट येईल हे मालिकेत येत्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असून टीआरपीच्या आकडेवारीत सुद्धा ही मालिका नेहमीच पुढे असते.