गेले काही दिवस गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. दरवर्षी अनेक कलाकार मुंबईतील मोठ्या गणपती मंडळांना भेट देत असतात. लालबागचा राजा हा मुंबईतील असा गणपती आहे. लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी अनेक कलाकार नतमस्तक होत असतात. दोन दिवसांपूर्वीच अभिनेता शिव ठाकरे यांने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. पण सर्वसामान्यांच्या रांगेत उभं न राहता त्याने व्हीआयपी दर्शन घेतल्यामुळे आता त्याने खंत व्यक्त केली आहे.

शिव ठाकरे याने दोन दिवसांपूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. अनेक भाविक काही तास बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगेत थांबले होते. परंतु शिव ठाकरे याने त्या मोठ्या रांगेत न जाता व्हीआयपी रांगेतून जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यामुळे इतरांच्या मानाने त्याला दर्शन पटकन मिळालं. आता त्याबाबत त्याने त्याचं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा : शिव ठाकरे ठरला ‘खतरों के खिलाडी’मधील सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक? एका एपिसोडसाठी मिळणार ‘इतकी’ रक्कम

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “बाप्पाचं दर्शन घेऊन मला खूप छान वाटत आहे. त्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. बाप्पासमोर नतमस्तक होताना मी भावूक झालो होतो. आज मी जे काही आहे ते तूच मला दिलं आहेस असं मी बापाला म्हटलं. मुंबईचा राजा, लालबागचा राजा हे प्रत्येक माणसाला माहिती असलेलं नाव आहे. देशभरातून लोक बाप्पाच्या दर्शनाला इथे येत असतात. मला रांगेत उभं न ठेवता थेट मूर्तीपर्यंत नेतात हे मला चांगलं वाटतं. पण जे लोक काही तास रांगेत थांबले आहेत ते माझ्याकडे बघून म्हणत असतील की, आम्ही थांबलोय इथे रांगेत आणि तू आधी गेलास. त्यामुळे त्याबद्दल सगळ्यांना खरंच सॉरी.”

हेही वाचा : शिव ठाकरेचा त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”; वीणा जगतापच्या नावाचाही उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “पण मला खरंच रांगेत उभं रहायला आवडेल. सेलिब्रिटींची तिथे एक वेगळी रांग असायला हवी जेणेकरून आम्हालाही बाप्पाच्या दर्शनासाठी स्वतःहून काहीतरी प्रयत्न करावे लागतील. पण मला व्हीआयपी रांगेतून दर्शन घेतल्याचं थोडं गिल्ट वाटत आहे. पण मला या सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचा खूप कौतुक वाटतं की एवढ्या सगळ्या लोकांची ते दिवसभर खूप चांगली व्यवस्था करतात.” त्यामुळे आता शिव ठाकरेच हे बोलणं चर्चेत आलं आहे.