Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या आश्रम केसमधून मधुभाऊंची निर्दोष सुटका करण्यासाठी अर्जुन नवनवीन प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मधुभाऊंवर दुसऱ्या एका खुनाचा आरोप करण्यात आल्याने सध्या अर्जुनसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.
महिपतने रचलेल्या नव्या प्लॅननुसार, पोलिसांना आश्रमाच्या परिसरात आणखी एक डेड बॉडी सापडते. या खुनाचा आरोप सुद्धा मधुभाऊंवर करण्यात येतो. दामिनी मोठ्या हुशारीने या सगळ्या गोष्टींचं खापर मधुभाऊंवर फोडते. पण, अर्जुन सुद्धा कमी नाहीये, तो वात्सल्य आश्रमात पुरलेल्या डेड बॉडीचा चेहरा तपासण्यासाठी रितसर परवानगी काढतो. अर्जुन-सायली या डेडबॉडीचा चेहरा पाहण्यासाठी लॅबमध्ये जातात…इतक्यात मृत व्यक्तीचा चेहरा पाहून सायली हरीश काका असं म्हणते.
खरंतर, हरीशचा खून महिपतने केलेला असतो. ही गोष्ट दामिनीला सुद्धा माहिती असते. पण, ती जाणूनबुजून सगळा आळ मधुभाऊंवर टाकते. अर्जुनला वेळीच या डेडबॉडीची ओळख पटल्याने त्याच्या हाती एक मोठा पुरावा लागणार आहे.
डेड बॉडी हरीशची आहे ही खात्री पटल्यावर अर्जुन हरीशच्या खुनाच्या तपासाकडे वळतो. तो हरीशच्या जवळच्या मित्राकडे याबद्दल चौकशी करतो. यावर अर्जुनसमोर एक मोठं सत्य उघड होतं. ते म्हणजे, हरीशच्या मृत्यूनंतरही त्याच्या नावाने एक वेगळीच व्यक्ती त्याच्या मोबाइल फोनवरून मेसेज करत असते. ही मेसेज करणारी व्यक्ती महिपतच्या साईटवर राहणारी असते. या माणसाला अर्जुन कोर्टात सर्वांसमोर उभं करून काही प्रश्न विचारणार आहे.
अर्जुन म्हणतो, “हरीशचा खून झाला, तो या जगात नव्हता. तेव्हा हा इसम हरीश बनून मेसेज करत होता. हा ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता ती बिल्डिंग महिपत शिखरेची कन्स्ट्रक्शन साइट होती. त्यामुळे मिस्टर महिपत शिखरे यांची दोन्ही केसमध्ये कसून चौकशी व्हावी.”
अर्जुनच्या या पुराव्यामुळे भर कोर्टात महिपतची चांगलीच कोंडी होणार आहे. न्यायाधीश सुद्धा महिमपतची चौकशी करण्याचे आदेश देणार आहेत. या सगळ्या घडामोडी पाहून सायली प्रचंड खूश होते. तिला नवऱ्याचा अभिमान वाटतो.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता अर्जुनच्या फिर्यादीनुसार आता महिपतची कसून चौकशी होणार आहे. मालिकेचा हा विशेष भाग ४ जून बुधवारी रात्री ८.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.