Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रतापने संपूर्ण सुभेदार कुटुंबीयांसमोर ठामपणे सायली-अर्जुनची बाजू घेतल्याचं नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळालं. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर चुकीच्या पद्धतीने उघड झालं होतं आणि त्या दिवसापासून या दोघांशी घरातील कोणीच नीट बोलत नसतं. मात्र, आता हळुहळू प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर येऊ लागला आहे.
प्रिया घरात प्रॉपर्टीच्या वाटणीचा विषय काढते आणि या गोष्टीची सुरुवात सायलीने केलीये असा आरोप तिच्यावर करते. यानंतर दोघींमध्ये प्रचंड वाद होतात. हा वाद थांबवण्यासाठी प्रताप सुभेदार मध्यस्थी करतात आणि प्रियाला खडेबोल सुनावतात. तू अश्विनशी लग्न करून घरात आल्यापासून रोज भांडणं होत असल्याचं प्रताप तिला तोंडावर सांगतात. पूर्णा आजी सुद्धा प्रियाला सुनावते.
एवढंच नव्हे तर सायली सुद्धा संपूर्ण कुटुंबीयांसमोर “पुन्हा माझ्या नवऱ्याच्या वाट्याला जाऊ नकोस” अशी ताकीद प्रियाला देते. यानंतर प्रताप सुभेदार, “मी यापुढे सायली-अर्जुनच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेन” असं सर्वांसमोर जाहीर करतात. हा निर्णय ऐकून प्रियाचा जळफळाट होतो. आता आगामी भागात सायलीचे सासरेबुवा प्रियाला पुन्हा एकदा अद्दल घडवणार आहेत.
सायली खुर्चीवरून उठत असते इतक्यात तिच्या पायात लचक भरते. यावर प्रिया म्हणते, “मी तुझे पाय चेपून दिले असते गं, पण…” पुढे लगेच प्रताप सुभेदार म्हणतात, “आता पण कशाला… तुझ्या मनात आलंय ना करून टाक!” सायली त्यांना “नको बाबा…” असं सांगते पण, प्रताप काही केल्या ऐकत नाहीत. “तन्वी आज तुझे काही करून पाय चेपून देणार, एवढं तरी पुण्य तिच्या पदरात पडूदेत” असं ते म्हणतात.
आता प्रियाकडे ( तन्वी ) काहीच पर्याय नसतो. ती खाली बसून सायलीचे पाय चेपून देते. प्रताप सर्वांसमोर प्रियाची चांगलीच कोंडी करतात. तिला सायलीची सेवा करण्याची अजिबात इच्छा नसते पण, आता काही करून तिला सासरेबुवांनी सांगितलेलं काम ऐकावं लागणार असतं.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ३० मे ( शनिवार ) रोजी प्रसारित केला जाणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज रात्री ८:३० वाजता प्रक्षेपित केली जाते.