लोकप्रिय बॉलीवूड आणि मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने झी मराठी वाहिनीवरील ‘चल भावा सिटीत’ या शोमधून छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. झी मराठीवरील ‘चल भावा सिटीत’ या रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन श्रेयसने केलं आणि त्याने ही जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली. हा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळा आणि नव्या ढंगाचा अनुभव होता. १५ मार्च रोजी सुरू झालेल्या या शोची नुकतीच सांगता झाली.

१ जून (रविवार) रोजी ‘चल भावा सिटीत’ या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोच्या अंतिम फेरीमध्ये अथर्व-रेवती, विजय-अनुश्री, ऋषिकेश-श्रुती, दीपक-प्रणाली आणि रामा-नीता या पाच जोड्या पोहोचल्या होत्या. या पाच जोड्यांमधील अंतिम लढतीत ऋषिकेश-श्रुती यांनी बाजी मारत ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरलं आणि ‘चल भावा सिटीत’ या शोच्या पहिल्या भागाचे ते विजेते ठरले. विजेते होताच दोघांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

ट्रॉफी जिंकताच श्रुतीने तिच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत असं म्हटलं, “इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की है, कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है। कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पूरी कायनत उसे तुमसे मिलने की कोशिष में लग जाती है, और आप सबने मुझे मेरी चाहत से मिला दिया.”

यापुढे ती म्हणते, “‘चल भावा सिटीत’ हा माझ्यासाठी केवळ एक शो नव्हता, तर तो एक प्रवास होता आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की, हा प्रवास मी जिंकले. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि या प्रवासात माझ्याबरोबर चालणाऱ्या प्रत्येकासाठी – हा विजय आपला आहे.” श्रुतीबरोबरच ऋषिकेश चव्हाणनेदेखील या विजयानिमित्तची पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये तो म्हणतो, “‘चल भावा सिटीत सीझन १’चा पहिला विजेता म्हणून मला खूप चांगलं वाटत आहे आणि शक्य झालं ते फक्त तुमच्या (प्रेक्षकांच्या) प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे. ही ट्रॉफी फक्त माझी नाही, तर ती आपल्या सगळ्यांची आहे. असंच प्रेम मला देत रहा. तुमचाच पैलवान ऋषिकेश चव्हाण. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद”. दरम्यान, दोघांनी हा शो जिंकल्यानंतर दोघांवर चाहत्यांकडून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चल भावा सिटीत’ या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी जीवनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पूर्णतः वेगळ्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावं लागलं. यासाठी त्यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले होते. शहरात राहणाऱ्या व्यक्तींनी ग्रामीण संस्कृती अनुभवली, तर ग्रामीण भागातील लोकांनी शहरी जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न केला आणि यात श्रुती व ऋषिकेश ही जोडी जिंकली.