मुंबई : जलसंधारणासाठी आखण्यात आलेल्या सरकारी योजनांमधून काढता पाय घेत ‘पाणीदार’ गावांसाठी उभ्या राहिलेल्या चळवळींमध्ये लोकांचा सहभाग वाढत आहे. लोकचळवळींना योग्य प्रशिक्षण दिल्यामुळे त्यात संघभावना निर्माण झाला आहे. परिणामी त्यापासून प्रेरणा घेऊन गेल्या काही वर्षांत पाणीदार गावांसाठीच्या लोकचळवळींमध्ये वाढ  झाल्याचे मत ‘बदलता महाराष्ट्र : आव्हान पाणी प्रश्नाचे’ याअंतर्गत ‘पाणी आणि लोकचळवळ ’ या चर्चासत्रात सहभागी झालेल्या व्यक्त्यांनी व्यक्त केले.

पाणी फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक आणि माजी सनदी अधिकारी नामदेव ननावरे, ‘आनंदवन’चे कौस्तुभ आमटे आणि उद्योजक यशवंत मराठे हे या चर्चासत्रात सहभागी झाले होते. जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकासासाठी सरकारी पातळीवर अनेक नियम आणि कायदे तयार होत आहेत. मात्र त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने पाण्याच्या प्रश्न गंभीर होत असल्याचे मत नामदेव ननावरे यांनी यावेळी व्यक्त  केले. शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीप्रती असलेल्या सरकारी अनास्थेमुळे लोकांनी याकडे पाठ फिरवली असून स्वमेहनतीच्या उद्देशाने त्यांनी पाणीदार गावासांठी लोकचळवळी उभ्या केल्याचे त्यांनी सांगितले.  गेल्या तीन वर्षांत ‘पाणी फाऊंडेशन’ने हाती घेतलेल्या स्पर्धात्मक चळवळींमध्ये गाव, पशिक्षणार्थी आणि स्वयंसवेकांच्या संख्येत लक्षणीय वाढ  झाली आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून झालेल्या मेहनतीमुळे २०१६ साली १३६८ कोटी लीटर, २०१७ साली ८२६१ कोटी लीटर आणि यंदा यामध्ये तिप्पट वाढ  झाल्याची शक्यता ननावरे यांनी व्यक्त केली. प्रदूषण, जंगलतोड, पाणी उपसा अशा मानवनिर्मित प्रश्नांमुळे प्राण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने आपणच त्यासाठी उपयायोजना राबवणे आवश्यक असल्याचे ननावरे म्हणाले. तसेच आगपेटी मुक्त शिवार, ठिबक आणि तुषार सिंचन अशा प्रकारच्या उपाययोजना राबवून शेतक ऱ्यांनीही पाण्याचे संधारण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले.

भूजल व्यवस्थापनाचे काम स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असल्याचे मत कौस्तुभ आमटे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले. रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण यांच्या बळावर पाण्यासाठीची लोकचळवळ सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले. आनंदवनात राबविलेल्या योजनांमध्ये दुष्काळग्रस्त भागातील  युवकांना पाणी व्यवस्थापनाचे धडे दिल्याने त्यांच्यामध्ये जलसंधारणाबाबत जागृकता निर्माण झाल्याचे आमटे म्हणाले. पाण्याच्या उपलब्धतेशिवाय विकास होऊ शकत नाही असे, मत यशवंत मराठे यांनी मांडले.

शहरांपासून हाकेच्या अंतरांवर असणाऱ्या गाव आणि आदिवासी पाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची  गंभीर समस्या आहे. अज्ञान, पाण्याचा उपसा आणि त्यासंबंधी असलेला व्यवस्थापनाचा अभाव या परिस्थितीला कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय पाण्याच्या चळवळीसाठी काम करणाऱ्या लोकांवरील अविश्वासामुळे  पाणी व्यवस्थानाच्या विकासामध्ये अडकाव निर्माण होत असल्याचे मत मराठे यांनी व्यक्त  केले.