मुंबईत गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. फक्त मुंबईतच नाही तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागांमध्येही पाऊस कोसळतो आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात तर पाणी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचले आहे. मध्य रेल्वेने बदलापूर ते कर्जतपर्यंत रेल्वे वाहतूक बंद केली आहे. तर काही वेळापूर्वीच कल्याणहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलही बंद केल्या आहे. दरम्यान अडकून पडलेल्या प्रवाशांची NDRF कडून सुटका करण्यात आली. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने रात्रीपासून मदतकार्य सुरु केले आहे.

मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. लोकलमध्ये जे प्रवासी अडकून पडले होते त्यांना सोडवण्यात आलं आणि जवळच्या प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं. पोलीस आणि एनडीआरएफचं पथक रात्रभरापासून बचावकार्य करत आहेत. मुसळधार पावसामुळे उल्हासनदीला दुथडी भरुन वाहू लागली आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर तसेच बदलापूर या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि अजूनही सुरु असलेल्या पावसामुळे कल्याण ते कर्जत रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही स्थानकांवर तसेच कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

पावसामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेसही बदलापूर वांगणीच्या दरम्यान थांबवण्यात आली. या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची  सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांची तुकडी पोहचली आहे झाली आहे. रुळावर प्रचंड पाणी साठलं आहे. या एक्स्प्रेसमध्ये ७०० प्रवासी आहेत त्यांची सुटका करण्यास आता एनडीआरएफकडून सुरुवात होईल.