गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव पूर्पणणे भरला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला. दरम्यान, पवई तलावाप्रमाणेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तलावक्षेत्रात पुन्हा दमदार हजेरी लावली असून याठिकाणी गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे ७५ मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने तलावक्षेत्रातील पावसाची हजेरी महत्त्वपूर्ण मानली जाते. जुलैअखेपर्यंत पाऊस पडला नाही, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पाणीकपातीचा निर्णय घेण्याच्या विचारात अधिकारी होते. मात्र तलावक्षेत्रात रविवारपासून जलधारा बरसू लागल्या आहेत. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत समाधानकारक हजेरी लावली. मुंबईला सर्वाधिक पाणी पुरविणाऱ्या भातसा धरणातही पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. तर अप्पर वैतरणामध्ये ९० मि.मी. पावसाची नोंद झाली. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणामध्ये सध्या २,६६,६८५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या एकूण पाणीसाठय़ापैकी एकटय़ा मध्य वैतरणामध्ये तब्बल १,१२,१८७ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. सध्या तलावातील जलसाठय़ाची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक असली तरी भविष्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडणे गरजेचे आहे, असे जल विभागातील अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. भविष्यात पावसाने दडी मारल्यास मुंबईकरांवर ऑगस्टमध्ये पाणीकपातीचे संकटकोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.