मुंबई : यंदापासून राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी गुरूवारी दुपारी २ वाजता बंद करण्यात आली. तोपर्यंत १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थांनी अर्ज भरले. त्यापैकी ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून अर्ज निश्चित केला. त्यामुळे तब्बल १ लाख ४१ हजार ३७१ इतके विद्यार्थी हे पहिल्या फेरीला मुकणार आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहेत. तर सर्वात कमी विद्यार्थी लातूर विभागातून आहेत.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला २६ मेपासून सुरुवात झाल्यापासून सतत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र त्यातही अखेरच्या दिवसापर्यंत १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली. यामध्ये १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क ऑनलाईन जमा केले. त्यातील १२ लाख ५ हजार १६२ विद्यार्थ्यानी अर्जाचा पहिला भाग भरला.

तर ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून अर्ज निश्चित (लॉक) केला आहे. त्यात इनहाऊस कोट्यासाठी ६४ हजार २३८, व्यवस्थापन कोट्यासाठी ३२ हजार ७२१ आणि अल्पसंख्यांक कोट्यासाठी ४७ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी अर्ज आहेत. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचा पहिल्या नियमित फेरीसाठी विचार करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्ज निश्चित केलेल्या ११ लाख २९ हजार ९३२ विद्यार्थी नियमित फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेले व फक्त अर्जाचा भाग १ भरलेले असे तब्बल १ लाख ४१ हजार ३७१ हजार विद्यार्थी पहिल्या नियमित फेरीपासून वंचित राहणार आहेत.

विभागनिहाय फेरीला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

पहिल्या फेरीसाठी मुकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातून ३५ हजार ३०३ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरलेला नाही. त्याखालोखाल पुणे विभागातून २० हजार ४५३ विद्यार्थी, छत्रपती संभाजी नगर विभागातून ११ हजार ३८३ विद्यार्थी, नाशिक विभागातून १० हजार ६५५ विद्यार्थी, नागपूर विभागातून ९ हजार ५८७ विद्यार्थी, अमरावती विभागातून ८ हजार ४४८ विद्यार्थी, कोल्हापूर विभागातून ७ हजार २५८ आणि लातूर विभागातून ५ हजार ५७९ विद्यार्थी पहिल्या नियमित फेरीला मुकणार आहेत.

मुंबई जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थी राहणार वंचित

मुंबई विभागातून सर्वाधिक ३५ हजार ३०३ विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या नियमित फेरीपासून वंचित राहणार आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरमधून सर्वाधिक १४ हजार १७५ विद्यार्थी पहिल्या नियमित फेरीपासून वंचित राहणार आहेत. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यातून १२ हजार ७८९ विद्यार्थी, पालघरमधून ५ हजार ५८७ विद्यार्थी आणि रायगडमधून २ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरलेला नाही.

पहिली प्रवेश यादी १० जून रोजी जाहीर होणार

पहिल्या नियमित फेरीसाठी १० जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ११ ते १८ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना पहिली फेरी झाल्यानंतर अर्ज पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी पहिल्या फेरीपासून वंचित राहिले तरी ते पुढील फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. परिणामी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

महेश पालकर, संचालक, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.