मुंबई : बेशिस्त वाहतूक, पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळय़ा पदपथांचा अभाव, रस्ते ओलांडताना केला जाणारा हलगर्जीपणा आदी कारणांमुळे राज्यात अपघातांची संख्या वाढत असून त्यात प्राण गमावणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. टाळेबंदी वगळता रस्ते अपघातांमध्ये पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते असून गेल्या सहा वर्षांत राज्यात १४ हजार ९७२ पादचाऱ्यांना अपघातांत जीव गमवावा लागला.
राज्यातील रस्ते पादचाऱ्यांसाठी प्राणघातक ठरत आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपायोजना करूनही रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी झालेले नाही. महामार्ग पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०१७ ते २०२२ या पाच वर्षांमध्ये एकूण १४ हजार ९७२ पादचाऱ्यांना अपघातात प्राण गमवावे लागले. २०१७ मध्ये एक हजार ८२२ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये दोन हजार ८९४ पादचारी मृत्युमुखी पडले.

राज्यात २०२२ मध्ये पादचाऱ्यांचे ६,७६४ अपघात झाले. त्यातील २,८३३ प्राणघातक अपघात होते. त्यात २,८९४ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. २,९५२ गंभीर अपघातांमध्ये ३,२८९ जण गंभीररीत्या जखमी झाले, तर ९२० किरकोळ अपघातामध्ये १०४९ पादचारी किरकोळ जखमी झाले होते. ५९ अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही ठिकाणचे रस्ते प्रशस्त असले तरी ते ओलांडण्याच्या दृष्टीने असुरक्षित आहेत. त्यामुळे वेगवान वाहने चुकवत जीव मुठीत घेऊन पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यांच्या या बेशिस्तीमुळेही पादचाऱ्यांना प्राण गमवावा लागतो. त्याचबरोबर पादचाऱ्यांच्या निष्काळजीमुळेही अपघात होत आहेत. पदपथांवरील फेरीवाले, अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहात नाही. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी मोठय़ा शहरांमध्ये स्कायवॉक आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले, मात्र त्यांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.