मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये तत्काळ तिकीट काढताना गडबड होत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, गेल्या १२ महिन्यात ऑनलाइन तत्काळ तिकिटे आरक्षित करण्यात अडचणी आल्याचे मत १० पैकी ७ जणांनी व्यक्त केले. तत्काळ तिकिटाचे आरक्षण सुरू झाल्यानंतर एका मिनिटात तिकिटे प्रतीक्षा यादीत जातात, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

सण-उत्सव, उन्हाळी हंगामात प्रवाशांना आरक्षित रेल्वे तिकिटे मिळणे कठीण असते. अत्यावश्यक प्रसंगी तत्काळ तिकीटे काढून, रेल्वे प्रवास करणे देखील शक्य असते. पण तत्काळ तिकीटे काही मिनिटातच प्रतीक्षा यादीत जात असल्याने, प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागते. तातडीने रेल्वे प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी, तत्काळ तिकिटांची सुविधा प्रदान केली आहे. १९९७ मध्ये तत्काळ प्रणाली सुरू करण्यात आली. कोणत्याही दलालाचा सहभाग न करता, शेवटच्या क्षणी आरक्षित तिकीट काढता येणे शक्य होते. परंतु, गेल्या दशकापासून तत्काळ तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांच्या शेकडो तक्रारी रेल्वे विभागाकडे येत आहेत. तर, समाज माध्यमावर आयआरसीटीसीवर तत्काळ तिकीट काढणे म्हणजे एक विनोद बनला आहे. तत्काळ तिकीट खरोखरच घोटाळा आहे की गैरव्यवस्थापित प्रणाली आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी १० वाजता आणि विना वातानुकूलित डब्यासाठी सकाळी ११ वाजता तत्काळ तिकीट आरक्षित होण्यास सुरुवात होते. परंतु तत्काळ तिकिटे काढण्यास सुरुवात केल्यास, एका मिनिटांतच सर्व तिकिटे आरक्षित होऊन, दुसऱ्या मिनिटाला तिकीटे प्रतीक्षा यादीत जातात. त्यामुळे तत्काळ तिकीट सुविधेचा कोणताही लाभ होत नाही, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. तसेच तत्काळ तिकीट मिळवण्याचा सर्वोत्तम पर्याय ट्रॅव्हल एजंटद्वारे आहे, असा विश्वास १० पैकी ३ जणांनी सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केला.

भारतीय रेल्वेने सर्व आयआरसीटीसी वापरकर्त्यांच्या खात्यांसाठी ई-आधार आधारित पडताळणी लागू करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य देणे आणि त्यांना तत्काळ तिकीट देणे शक्य होईल. आयआरसीटीसीवरून १ कोटी ३० लाखांहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. परंतु, फक्त १.२ कोटी खाती आधारकार्डद्वारे सत्यापित केलेली आहेत. त्यामुळे रेल्वे मंडळाद्वारे उर्वरित खात्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवित आहेत. आधारकार्ड वापरून त्यांची खाती पडताळण्यात अयशस्वी होणाऱ्या वापरकर्त्यांचे खाते निलंबित किंवा बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय रेल्वेद्वारे देण्यात आली.

ऑनलाइन माध्यमाद्वारे दररोज सुमारे २,२५,००० प्रवासी भारतीय रेल्वेचे तत्काळ तिकिटे आरक्षित करतात. २४ मे ते २ जून या कालावधीत ऑनलाइन तिकिटे आरक्षित करण्याच्या पद्धतींचे विश्लेषण केल्यावर असे दिसून आले की, तिकीट खिडकी उघडल्यानंतर पहिल्या मिनिटात सरासरी १,०८,००० वातानुकूलित तिकिटांपैकी फक्त ५,६१५ तिकिटे आरक्षित करण्यात आली. तर, दुसऱ्या मिनिटात २२,८२७ तिकिटे आरक्षित करण्यात आली. तर, पहिल्या १० मिनिटांत ऑनलाइन आरक्षित केलेल्या सर्व तिकिटांपैकी ६२.५ टक्के आहेत. याच कालावधीत विनावातानुकूलित दररोज सरासरी १,१८,५६७ तिकिटे ऑनलाइन आरक्षित करण्यात आली. यापैकी ४,७२४ तिकिटे पहिल्या मिनिटात आणि २०,७८६ तिकिटे दुसऱ्या मिनिटात आरक्षित करण्यात आली. तर, पहिल्या १० मिनिटात ६६.०४ टक्के तिकिटे काढण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय रेल्वेने गेल्या सहा महिन्यांत २.४ कोटींहून अधिक वापरकर्त्यांना निष्क्रिय केले आहे. तसेच सुमारे २० लाख इतर खाती संशयास्पद म्हणून चिन्हांकित केली आहेत, अशी माहिती भारतीय रेल्वेद्वारे देण्यात आली.