Aram रोज संध्याकाळी सहा वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरच्या बाजूला मुंबईकर रांगा लावून उभे असतात. या रांगा बस किंवा टॅक्सीसाठी नसतात, ट्रेनच्या तिकिटांसाठीही नसतात. या रांगा लावलेल्या असतात वडा-पाव खाण्यासाठी. बरोबर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर ८६ वर्षांपासून चोखंदळ खवय्यांना आपलंसं वाटणारं ठिकाण म्हणजे आराम वडा-पाव सेंटर. जंबो वडा आणि त्याला साजेसा पाव. एक वडा-पाव खाल्ला की मुंबईकर घरी भरल्या पोटी जायला मोकळे.
आराम चालवणाऱ्यांची तिसरी पिढी व्यवसायात
आराम वडा-पाव सेंटर चालवणाऱ्या मालकांची तिसरी पिढी आता या व्यवसायात आहे अशी माहिती ५५ वर्षीय कौस्तुभ तांबे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. श्रीरंग तांबे यांनी १९३९ मध्ये आराम वडा-पाव सेंटर सुरु केलं. श्रीरंग तांबे यांना भाऊ असं म्हटलं जायचं. श्रीरंग तांबे हे माझे आजोबा होते असं कौस्तुभ तांबेंननी सांगितलं. आज परिस्थिती अशी आहे की आराम वडा पाव हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील लँड मार्क झालं आहे. माझे आजोबा श्रीरंग तांबे यांनी कॅपिटल सिनेमा थिएटर असलेल्या इमारतीत हे सेंटर सुरु केलं. त्यांनी कॅपिटलच्या मालकांची भेट घेतली आणि या ठिकाणी छोटं उपहारगृह सुरु करु अशी इच्छा व्यक्त केली. जेव्हा हे उपहार गृह सुरु झालं तेव्हा आराम मिल्क कॉऑपरेटिव्ह असं या ठिकाणाला म्हटलं जात असे. कारण या ठिकाणी चहा, कॉफी, बासुंदी, गुलाबजाम, खीर असे दुधापासून तयार केलेले पदार्थ मिळत. तसंच या ठिकाणी बटाटा वडाही मिळत होता.

आराम सध्या कसं आहे?
आराम सध्या कसं आहे? हे विचारल्यावर कौस्तुभ तांबे सांगतात, सध्या ४८ माणसं बसू शकतील एवढं उपहारगृह आहे. तसंच आम्ही आता आमच्या मेन्यूमध्ये कोथिंबीर वडी, थालीपीठ, झुणका भाकरी, बाजरीची भाकरी आणि पिठलं, तांदूळ भाकरी आणि पिठलं, उपासाचे पॅटिस, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, पियूष असे पदार्थ ठेवतो. शिवाय बटाटा वडा आणि पाव तसंच मिसळ हे पदार्थ आणि चहा-कॉफी तर मिळतातच. त्यामुळे आराम हे लोकांची रसना तृप्ती करत ठामपणे उभं आहे.
कौस्तुभ तांबे यांंनी आरामविषयी आणखी काय सांगितलं?
कौस्तुभ तांबे सांगतात, माझ्या आईने इथल्या स्टाफला विविध पदार्थ शिकवले आहेत. तसंच पदार्थांचा दर्जा आणि त्याची चव हे आमचे दोन मुख्य उद्देश आहेत. उपासाची मिसळ, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी हे पदार्थ आमच्याकडे लोक खास खायला येतात. उपवासाची थाळीही आमच्याकडे मिळते. ज्यात राजगिरा पुरी, उपवासाची बटाटा भाजी, उपवासाची मिसळ, पॅटिस, राजगिरा रोल, केळं आणि पियूष हे आम्ही देतो.
आराम वडापावबाबत कौस्तुभ तांबे यांनी काय सांगितलं?
आरामचं जे आत्ता बाहेर दिसणारं सेंटर आहे ते १९९५ मध्ये सुरु झालं आहे. त्यावेळी एक वडापाव ५ रुपयांना मिळत होता. आता त्याच वडापावची किंमत २५ रुपये झाली आहे. आम्ही जो वडा आणि पाव लोकांना देतो तो नेहमीच्या वडा-पावपेक्षा मोठा आहे. आम्ही जे पाव लोकांना देतो ते खास तयार केलेले असतात. शिवाय आम्ही वडे तळण्यासाठी रिफाईंड तेलच वापरत असतो. शिवाय जे डाळीचं पीठ असतं तेदेखील सम्राटचं वापरतो. वडा तयार करण्याची पद्धत साधी सोपी आहे. आम्ही चव आणि दर्जा देत आहोत, तो टिकवून आहोत म्हणून वडा-पाव सेंटरच्या बाहेर रांगा दिसतात. लोकांना हा वडा-पाव खाल्ला की समाधान मिळतं. असंही कौस्तुभ तांबे सांगतात.