मुंबई : गेल्या वीस वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पूर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोव प्रकल्प यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही, याचे उत्तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी द्यावे. लाखो रुपयांची उधळपट्टी करून उद्धव ठाकरे गटाने मुंबईकरांशी बेईमानी केली आहे, असा आरोप मुंबई उपनगर पालकमंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड आशिष शेलार यांनी बुधवारी केला.

मुंबईत निर्माण आलेल्या पूर परिस्थितीबाबत आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने बुधवारी महापालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन अनेक सूचना केल्या. तसेच, ब्रिमस्टोवॅडसह गेल्या वीस वर्षांच्या काळात मुंबईत खर्च झालेल्या एक लाख कोटी रुपयांच्या कामांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विकासकांच्या नावावर गेल्या २० वर्षांत मुंबईकरांचे १ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. त्या खर्चाचा हिशेब त्यांनी मुंबईकरांना द्यावा आणि त्यांनंतरच मागच्या तीन वर्षांचा हिशेब आम्हाला विचारावा, असे शेलार यांनी स्पष्ट केले. ब्रिमस्टोवँडचा प्रकल्प आजपर्यंत का पूर्ण झाला नाही, त्यासाठी सन २०१७ पर्यंत किती निधी खर्च झाला, याबाबत त्यांनी आयुक्तांकडे विचारणा केली.

मोसमी पावसाच्या पहिल्या दिवशी पाणी उपसा करणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने अनेक भागांत पाणी साचले. तसेच, ब्रिटानिया पंपिंग स्टेशन कार्यान्वित नसल्याने दक्षिण मुंबईत पाणी साचले होते. या पंपिंग स्टेशनची निविदा मर्जितील कंत्राटदार कंपनीला मिळावी, यासाठी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अटींमध्ये कोणते बदल केले. त्याचा परिणाम कामावर कसा झाला, तसेच पाणी उपसा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणारे निकष कंत्राटदार कंपनीसाठी कसे बदलले गेले त्याचे वास्तव आयुक्तांनी मुंबईकरांसमोर मांडावे, अशीही मागणी शेलार यांनी केली. सागरी किनारा मार्गावर निविदेतील निकष बाजूला सारून तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मर्जीतल्या लोकांना काम दिले. त्यानंतर तेथे निकृष्ट दर्जाची माती, दगड, खडी भरावात वापरली गेली, असाही आरोप त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई उपनगरातील ८२ जागांपैकी ४७ जागा दरडप्रवक्ष क्षेत्र म्हणून धोकादायक आहेत. त्यापैकी ९ फुटापर्यंतच्या दरडींना म्हाडातर्फे संरक्षक जाळ्या लावण्यात येतात. त्यापेक्षा जास्त उंचीच्या भिंतीना जाळी लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. मात्र त्यांच्याकडे निधी नसल्याने पालिकेने निधी उपलब्ध करून तातडीने संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशा सूचना शेलार यांनी केल्या. या बैठकीत माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, कमलेश यादव, रिटा मकवाना, प्रकाश गंगाधरे, आशा मराठे, हर्षिता नार्वेकर, रोहिदास लोखंडे आदींचा समावेश होता.