मुंबई : गेल्या सहा महिन्यात मुंबईत २ लाख ५० हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद असून गेल्या तीन महिन्यांतील मोहिमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला दिले.

मुंबईत वाढत असलेले डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबत माहिती घेण्यासाठी ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर, महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा, तसेच सरकारच्या आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत २ लाख ५० हजार उंदरांचा खात्मा केला, तर १ जून ते २१ जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूषकांची संख्या १,७४१, तर पिंजरे लावून पकडलेल्या मुषकांची संख्या २०१५ इतकी आहे. १७ विभाग कार्यालयांच्या हद्दीत १७ संस्था हे काम करी आहेत. तर पिंजरा लावून मूषक पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत. मात्र ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून किती उंदीर मारले ? कुठे टाकले ? ही कारवाई किती विभागात करण्यात आली ? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का ? या सर्वांची तीन महिन्यांची चौकशी करण्यात यावी. गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अशा प्रकारे पालिकेने कधी उंदीर मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. पिंजरा कुठे लावल्याचे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत हिवतापाचे १ ते २१ जून या कालावधीत ५५४ रुग्ण आढळले असून डेंग्यूचे ७१, तर चिकनगुनियाचे ६, लेप्टोस्पायरसिस २४, गॅस्ट्रो ६२० रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने १ ते २१ जून या कालावधीत सहा लाख ३९ हजार ४३० घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण ३० लाख ५६ हजार ५२८ नागरिकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. एकूण १ लाख २ हजार २४३ रक्त नमुने गोळा करण्यात आले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या ६२,४८४ आहे. यासाठी ३७ शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन ५,१०८ ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर गॅस्ट्रो रोखण्यासाठी २१,४२९ ओआरएस गोळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. आदी उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या काळात या सर्व उपाययोजना २५ टक्क्यांनी वाढवा, असे निर्देश शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.