मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने मालमत्ता करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र असे असले तरी करवसुलीमध्ये सुमारे २१०० कोटी रुपयांची तूट आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असून मुंबई महानगरपालिकेला या तीन दिवसांत ४५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे.

पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यास २७ फेब्रुवारीपासून सुरुवात केली. तसेच ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन विभागाने अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे. विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी, तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे काम सुरू आहे. समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधून, तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे काम सुरू आहे.

हेही वाचा…सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

करदात्यांनी ३१ मार्च २०२४ पर्यंत कराचा भरणा करावा यासाठी त्यांना ध्वनिक्षेपक, ठळक बॅनर, तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून प्रोत्साहित करण्यात येत आहे. शुक्रवारी २८ मार्च २०२४ दुपारी ३ वाजेपर्यंत २ हजार ३९८ कोटी रुपये कर वसूला झाला.

जकात रद्द केल्यानंतर पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन हे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्राोत उरले आहेत. तसेच जकातीपोटी नुकसानभरपाईतूनही पालिकेला उत्पन्न मिळते. मालमत्ता करातून पालिकेला दरवर्षी सहा हजार कोटींचे उत्पन्न मिळते. मालमत्ता कराच्या दरात दर पाच वर्षांनी सुधारणा करण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. करोनामुळे व निवडणुका होतील या अंदाजामुळे ही सुधारणा गेली तीन वर्षे होऊ शकलेली नाही. त्यामुळे मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊ शकली नाही. चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) ही सुधारणा होईल असे पालिका प्रसासनाला अपेक्षित होते.

हेही वाचा…आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

त्यामुळे पालिकेने चालू आर्थिक वर्षात ६००० कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहीत धरले होते. मात्र ही सुधारणा यंदाही झाली नाही. त्यामुळे मालमत्ता कराच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यातच या वर्षी देयकांचा वाद झाल्यामुळे गेल्या वर्षी इतके उत्पन्न मिळवणेही पालिकेला मुश्कील होणार आहे.

हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स

उत्पन्न ४०० कोटींनी कमी

सन २०२२-२३ या गेल्या आर्थिक वर्षात ७००० कोटींचे उत्पन्न मालमत्ता करात ग्राह्य धरण्यात आले होते. मात्र कररचनेत सुधारणा न झाल्यामुळे अखेर उद्धिष्ट ४८०० कोटी सुधारित करण्यात आले होते. गेल्या वर्षी ३१ मार्च २०२३ पर्यंत ५,५७५ कोटींची वसुली झाली होती. तर चालू आर्थिक वर्षात ६००० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र मालमत्ता कर देयके देण्यास विलंब झाल्यामुळे ६००० कोटींचे लक्ष्य कमी करून ४५०० कोटी करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२२ पासून मुंबईत पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण करमाफी दिल्यामुळे १६ लाख मालमत्ताधारकांना त्याचा लाभ झाला, मात्र पालिकेचे उत्पन्न ३५० ते ४०० कोटींनी कमी झाले आहे.