मुंबई : नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहन वारंवार करूनही त्याला न जमानणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. धारावी येथील टी जंक्शन नाला स्वच्छ केल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कचरा टाकल्याचे निदर्शनास आले असून या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाने भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२६ (क) अन्वये शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नाल्यात कचरा टाकल्याप्रकरणी ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतील अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्यात येतो. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी, अतिवृष्टीच्या वेळी पाणी साचते आणि त्याचा निचरा होत नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमध्ये औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पावसाळी कामांचा भाग म्हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ दरवर्षी काढला जातो. गाळ काढण्याचे काम योग्य पद्धतीने व्हावे म्हणून यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामात परिणामकारकता व पारदर्शकता यात वाढ झाली आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी व तपासणी प्रत्यक्ष भेट देऊन करीत आहेत. मोठ्या व छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असले तरी भरतीसोबत तरंगता कचरा जमा झाल्यामुळे वारंवार नालेसफाई करावी लागत आहे. मुंबईत दरवर्षी नालेसफाई होत असली तरी नाल्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे तरंगत्या कचऱ्याची समस्या वारंवार उद््भवते.
नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. नाल्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्यास प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी जाळी बसविली आहे. तथापि, काही व्यक्ती / आस्थापना नाल्यांमध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तू (फ्लोटिंग मटेरीअल) टाकत असतात. त्यामुळे सांडपाणी वहन, निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो.
धारावी येथील टी जंक्शनकडे जाणाऱ्या नाल्याची महानगरपालिकेने नुकतीच स्वच्छता केली होती. गाळाबरोबरच तरंगत्या वस्तूही नाल्यातून काढण्यात आल्या होत्या. मात्र सोमवारी १६ जून रोजी जी उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अज्ञातांनी या नाल्यात थर्माकॉल, रबर, रॅपर्स, पार्सल बॉक्स आदी औद्योगिक कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शाहूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
नालेसफाईच्या कामात अडथळा निर्माण करणारी ही कृती गंभीर असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनास अडचणी निर्माण होत आहे. यासंदर्भात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२६ (क) अन्वये दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांमार्फत संबंधित व्यक्ती / आस्थापनाचा शोध घेण्यात येत आहे.
नागरिकांनी कचरा टाकू नये – पालिकेचे आवाहन
नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल अशा विविध वस्तू व तत्सम कचरा नाले किंवा गटारांमध्ये टाकू नये. जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत आणि पाण्याचा जलद निचरा होत राहील. नाल्याच्या नजीकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी, नागरिकांनी कोणताही कचरा नाल्यात टाकू नये. कचराकुंडीतच कचरा टाकावा, असे आवाहन पालिका प्रशसानाने केले आहे.