मुंबई : मुंबईत कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनू लागली असून महानगरपालिकेला दरदिवशी जमा होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. त्यातच गृहनिर्माण संकुलांमधून गोळा केलेला कचरा खासगी कंत्राटदार रस्त्यांवर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्त्यांची स्वच्छता राखणे कठीण होत असून रस्त्यांवर कचरा फेकणाऱ्या खासगी कंत्रादारांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
सध्यस्थितीत मुंबईत दररोज ६५०० मेट्रिक टनाहून अधिक कचरा जमा होत असून कचराभूमीतील कचऱ्याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय या कचऱ्याचे वर्गीकरणही होत नसल्याने त्यावर प्रक्रिया करताना महापालिकेला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. दररोज विविध ठिकाणच्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिका विशेष स्वच्छता मोहीम राबवत असते. मात्र, अनेक ठिकाणी गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ते अधिक अस्वच्छ होत असल्याने संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी अधिकाऱ्यांना गुरुवारी आदेश दिले आहेत. तसेच, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रावर अनुपस्थित राहिल्यास अथवा कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सार्वजनिक स्वच्छतेसाठी नेमलेले मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, तसेच बाह्य संस्थांचे कर्मचारी यांनी जबाबदारीने स्वच्छता केल्यास मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर राहील. मात्र, गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदारांमार्फत रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकण्याचे प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
घाटकोपर येथील ‘एन’ विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पूर्व उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा जोशी यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आणि मुकादम यांनी समन्वयाने तसेच योग्य संवाद साधून जबाबदारी पार पाडावी. तसेच, सर्व प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील उपस्थिती, कामगिरी आदी बाबींची नियमित पाहणी करून आढावा घ्यावा. तसेच, स्थानिक परिस्थिती, वर्दळीची ठिकाणे, मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होणारी ठिकाणे आदी बाबींचा विचार करून कचरा संकलनासाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचनाही डॉ. अश्विनी जोशी यांनी केल्या.