4-Storey Building Collapses in Mumbai: कुर्ला पूर्व परिसरातील एस. जी. बर्वे मार्गावरील एसटी स्थानकाच्या मागे असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री कोसळली, तर दुसरी विंग अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. दुर्घटनेत आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.३ जणांवर राजावाडी रुग्णालयात तर एकावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ९ जखमींवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या भूखंडावर उभ्या असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत रहिवाशांची सुखरुप सुटका केली. या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले. या दुर्घटनेत अजय भोले बासफोर (२८) यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या अन्य एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

“आम्ही जेवून नुकतेच भांडी घासत होतो. रात्रीचे ११.३० वाजले होते. तितक्यात भूकंप झाल्यासारखे जाणवले आणि आम्ही घराबाहेर पळालो. अचानक पूर्ण इमारत कोसळली. आम्ही चौथ्या मजल्यावर राहत होतो. इमारत कोसळ्यावर ढिगाराच्या वरच्या बाजूला असल्याने आम्ही सुरक्षित बाहेर पडलो. परंतु खालच्या मजल्यावरचे रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले,” असे या घटनेत जखमी झालेल्या संतोषकुमार गोड यांनी सांगितले.

या इमारतीमध्ये ४० बांधकाम मजूर राहत होते. हे सर्व मजूर कुर्ल्यातच काम करत होते. या मजुरांमधील अजय बसपाल या २८ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. याचे कुटुंब गावाला असून तो कामासाठी मुंबईत आला होता.

जखमींची नावे –

दुर्घटनेत जखमी झालेले चैत बसपाल (३६), संतोषकुमार गौड (२५), सुदेश गौड (२४), रामराज रहमानी (४०), संजय माझी (३५), आदित्य कुशवाह (१९), अबिद अन्सारी (२६), गोविंद भारती (३२), मुकेश मोर्य (२५), मनिष यादव (२०) यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. नऊ जखमींवर उपचार करुन घरी त्यांना पाठविण्यात आले. उर्वरित एकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुर्घटनेतील अन्य एक जखमी अखिलेश माझी (३६) याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजावाडी आणि शीव रुग्णालयात दाखल जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धोकादायक इमारत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाईक नगर परिसरातील एकमेकांना खेटून असलेल्या चार इमारती धोकादायक असल्याने पालिकेने रहिवाशांना स्थलांतर करण्याची सूचना दिली होती. मात्र रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या नव्हत्या. पडलेली इमारत त्यातीलच एक असल्याचे समजते आहे.