संदीप आचार्य,लोकसत्ता
मुंबई : सातासमुद्रापार राहूनही आपल्या मातीशी असलेले नात्याचे इमान जपण्याची आस आणि जन्मदात्या मातेची इच्छा उराशी बाळगून सह्याद्रीच्या कुशीतल्या एका टुमदार गावात एक अनोखा प्रकल्प उभा करून कोकणातल्या पारकर बंधूंनी मातीचे ऋण फेडले, आणि कूस धन्य झाल्याच्या जाणिवेने सागराशी लडिवाळ लगट करणारा सह्याद्री समाधानाने हसला… कोकणच्या मातीला माणसं घडविण्याचा अनोखा आशीर्वाद निसर्गाने दिला आहे. याच मातीने घडविलेले ख्यातनाम फ्फुफुसरोगतज्ज्ञ डॉ. जलाल पारकर आणि विदेशात राहूनही गावाशी नाळ जोडलेले त्यांचे डॉक्टर बंधू यांनी हातात हात घालून तळकोकणातील आपल्या मातीत उभारलेला एक पंचतारांकित वृद्धाश्रम त्यांच्या संवेदनशील स्वभावाची साक्ष देतो. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील टोकोडे येथे उभारलेला ‘मिलन’ नावाचा हा पंचकारांकित वृद्धाश्रम ही कोकणातील गरीब आणि गरजू वयोवृद्धांचे उत्तरायुष्य समृद्ध व समाधानी करणारी अनोखी देणगी ठरत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले आणि कोकणात विकासाबरोबरच माणुसकीलाही बहर आला…
मूळचे कोकणातील असलेल्या पारकर कुटुंबातील तिघेही भाऊ वैद्यक क्षेत्रात पारंगत डॉक्टर आहेत. कोकणात गावाकडे वृद्धाश्रम असावा, ही त्यांच्या आईची इच्छा होती. या संदर्भात माहिती देताना डॉ. जलील पारकर यांनी सांगितले की, कोकणची मंडळी शिक्षणासाठी, नोकरीसाठी मुलाबाळांना मुंबई-पुण्यासारख्या शहराकडे पाठवतात. कोकणात असलेली वयस्कर मंडळी वृद्धापकाळात एकटी राहू शकत नाहीत, आणि त्यांना शहरातील अपुऱ्या जागेतील घरांत करमत नाही, अनेकदा वृद्धांची काळजी घेण्यास कुणी पुढे येत नाही, अशा गरजू वृद्धांना कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी राहता यावे, याकरता या तिघा भावांनी मिलन हा वृद्धाश्रम उभारला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे साडे सहा एकरची जागा त्यांनी विकत घेतली. त्यांच्या मोठ्या भावाने वृद्धाश्रमाचा आराखडा तयार केला. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात ‘सीएसआर’ निधीतून त्यांनी या वृद्धाश्रमाचे बांधकाम केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण १४ टुमदार घरे (व्हिला) बांधली असून ६ लोकांना एकत्र राहता येईल अशी डॉर्मेटरीही बांधण्यात आली आहे. सामायिक स्वयंपाकघर असून शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन स्वतंत्र स्वयंपाकघरे आहेत.
अलीकडेच १५ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशनद्वारे निर्मित व संचालित या ‘मिलन’ वृद्धाश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ जलील पारकर हे जेजे रुग्णालयात अनेक वर्षे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर ते सध्या लीलावती रुग्णालयात कार्यरत असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून अनेक बड्या मंडळींचे वैद्यक तज्ज्ञ म्हणून त्यांनी आजपावेतो जबाबदारी सांभाळली आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या डॉ. जलील पारकर यांनी वेळोवेळी शेकडो गरजू रुग्णांना मदत केली आहे.
मिलन वृद्धाश्रमाचा परिसर अत्यंत हिरवागार व निसर्गरम्य असून आजच्या घडीला परिसरात साडेसहाशे झाडे लावण्यात आली आहेत. यात इस्रायलहून खास आणलेल्या आंब्यापासून चिकू, पेरू, फणस, काजूची बरीच झाडे आहेत. त्याशिवाय वृद्धाश्रम परिसरात वाफे तयार करून त्यात भाजीपाला पिकवला जातो. गाई-म्हशी, बकऱ्या, कोंबड्या, बदके पाळण्यात आली आहेत. विहिरी, तलाव, एक तळे, अशा या परिसरात कोकणचे निसर्गवैभव कायम ठेवून पंचतारांकित वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. यातील टुमदार घरे तसेच डॉर्मेटरी वातानुकुलित असून, खोल्यांत व्हीलचेअरही जाऊ शकेल अशी मोठाली शौचालये आहेत. एलइडी टीव्ही संचांनी वृद्धांचे रंजन होते. सामान ठेवण्याच्या सुसज्ज खोल्या हेही ‘मिलन’चे वैशिष्ट्य.एकूण ६७ वृद्धांची मोफत निवास व्यवस्था या वृद्धाश्रमात होऊ शकेल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या धर्तीवर इथे वृद्धांना मोफत प्रवेश दिला जाईल असे डॉ जलील पारकर यांनी सांगितले. ज्यांना येथे राहण्यासाठी पैसे द्यावेसे वाटले तर ते घेतले जातील, अन्यथा येथे मोफत राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
मरियम देशमुख आणि दाऊद ए. जी. पारकर यांची मुले असलेली ही तीन भावंडे मुंबईत जन्मली असली तरी त्यांचे मूळ गाव मंडणगड तालुक्यातील सावित्री नदीच्या काठी वसलेले बंकोट हे आहे. या तीन भावांपैकी डॉ. खलील पारकर हे रुग्णालय नियोजक असून सध्या कॅनडातील व्हॅन्कुव्हर येथे वास्तव्यास आहेत. डॉ. जलील पारकर यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालय आणि नंतर वैद्यकीय शिक्षण मुंबईच्यात ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. फुफ्फुसरोग औषधोपचार (Pulmonary Medicine) या विषयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण संपादन केले. त्यांना अमेरिका, ओहायो येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स ऑफ क्लीव्हलंडतर्फे फुफ्फुसरोगा संबंधीची जी.एम.सी. फेलोशिप मिळाली आहे. २३ वर्षे ते फुफ्फुसरोग विषयाचे डीएनबी प्राध्यापक तसेच जी. एम.सी.मध्ये पदवी व पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सध्या लीलावती रुग्णालय व पोलिस रुग्णालय यांच्याशी ते संलग्न आहेत. तिसरे भावंड असलेले डॉ. नदीम पारकर हे अमेरिकेतील तीन अभ्यासमंडळांद्वारे प्रमाणित असलेल्या पदवी अंतर्गत अवयवांच्या आजारांचे निदान आणि उपचार, अतिदक्षता चिकित्सा, हृदय-फुफ्फुस प्रतिमा चिकित्सा या तीनही विद्याशाखेत पारंगत आहेत. ते सध्या क्लीव्हलँड क्लिनिक, ओहायो येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृद्धाश्रमाच्या उदघाटन प्रसंगी केलेल्या भाषणात म्हटले की, आनंदही व्हावा आणि खंतही वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात. आनंद असा की, महाराष्ट्रातील सर्वोत्तम चार-पाच वृद्धाश्रमांत गणना व्हावी असा वृद्धाश्रम डॉ. जलील पारकर यांनी या ठिकाणी बांधला आहे आणि खंत याची की, अलीकडच्या काळात कुटुंबातील नात्याचा ओलावा कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर वृद्धाश्रमांची गरज भासायला लागली आहे. आगामी २० वर्षांत व्यक्तीचे सरासरी वय ८५ वर्षे होणार असून वृद्धांची संख्याही वाढणार आहे, अशा वेळी राज्य म्हणून वृद्धांच्या समस्यांवरील उपाययोजनांचा विचार करावा लागणार आहे. जेव्हा समाजात अशा प्रकारचे एखादे आव्हान उभे राहाते, त्यावेळी त्याचा सामना करण्याकरता डॉ. पारकर यांच्यासारखे कुणीतरी पुढे येते आणि व्यवस्था उभे करते, हे वाखाणण्याजोगे आहे. डॉ. पारकर कोविडमुळे आजारी असतानादेखील त्यांनी जी रुग्णसेवा केली, त्याबद्दलही फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश कदम, खा. सुनिल तटकरे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशनचे विश्वस्त, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
आयुष्यभर शेकडो रुग्णांची सेवा करत डॉ. जलील पारकर यांनी सामाजिक कार्याचा वसा जपलेला आहेच, त्याच कार्याला जोड देत तिघा भावंडांनी मिळून कोकणातील मंडणगड तालुक्यात उभारलेल्या मिलन वृद्धाश्रमाच्या या प्रकल्पाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा नवा पायंडा घातला आहे. निष्णात वैद्यक तज्ज्ञ असलेल्या डॉ. जलील पारकर, डॉ. खलील पारकर आणि डॉ. नदीम पारकर या तिघा भावंडांनी आपल्या प्रगत वैद्यकीय ज्ञानामुळे सातासमुद्रापार कीर्ती संपादन केली आहेच, मात्र, मूळच्या कोकणातील असलेल्या पारकर कुटुंबातील या सुपुत्रांनी रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथे ‘मिलन’ हा अद्ययावत सोयीसुविधांयुक्त वृद्धाश्रम उभारून मातीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे.