मुंबई: महायुतीचे सरकार २०१४ मध्ये राज्यात आल्यानंतर समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले होते. आज याची पूर्तता होत आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास अतिजलद होणार आहेच, पण या महामार्गामुळे राज्याचा आर्थिक, औद्योगिक विकासही साधला जात आहे. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे राज्याच्या आर्थिक समृद्धीचा महामार्ग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इगतपुरी येथे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील ७६ किमीच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण गुरुवारी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती. लोकार्पणानंतर शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. आता मुंबई ते नागपूर अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासात पार करता येणे शक्य झाले आहे.
नागपूर आणि मुंबईतील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ७०१ किमीचा आणि ६१ हजार कोटी रुपये खर्चाचा नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला. या महामार्गातील ६२५ किमीचा महामार्ग (नागपूर ते इगतपुरी) वाहतूक सेवेत दाखल होता. या महामार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गाडीने शेवटच्या टप्प्यातील सर्वात मोठ्या ८ किमीच्या इगतपुरी येथील बोगद्यातून प्रवास केला. यावेळी गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केले.
समृद्धी महामार्गामुळे २४ जिल्ह्यांना फायदा होत असून जेएनपीटी बंदर जोडले गेले असल्याने विदर्भातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होत आहे. येत्या काळात हा महामार्ग देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराशीही जोडला जाणार आहे. महायुतीच्या काळात सुरू झालेला प्रकल्प महायुतीच्याच काळात पूर्ण करत आज आम्ही या महामार्गाचे लोकार्पण करत आहोत. आज आमचे एक मोठे स्वप्न पूर्ण होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
शक्तिपीठ महामार्गही लवकरच मार्गी
हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असल्याचे म्हणत या प्रकल्पाचे आणि प्रकल्प उभारणी करणाऱ्या एमएसआरडीसीचे कौतुक केले. तसेच समृद्धीप्रमाणे शक्तिपीठ महामार्गालाही विरोध होत आहे. पण लवकरच आम्ही शक्तिपीठ महामार्गही तयार करू. शक्तिपीठ महामार्गही राज्याचे, मराठवाड्याचे चित्र बदलणारा मार्ग ठरेल असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
समृद्धी महामार्गातील शेवटचा टप्पा अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण होता. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प होऊच नये यासाठीही काही जण प्रयत्नशील होते. पण अखेर आज हा प्रकल्प पूर्ण झाला. पर्यटन, उद्योग आणि कृषी क्षेत्राला चालना देणारा असा हा प्रकल्प असून शेवटच्या टप्प्यामुळे नाशिक जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
सुरुवातीला या प्रकल्पास मोठा विरोध झाला. पण भूसंपादनासाठीच्या मोबदल्याचे दर जाहीर झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांचा विरोध दूर झाला आणि हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली आणि आता त्यांच्याच हस्ते लोकार्पण झाले. असा योग क्वचित येतो.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.अजित पवार, उपमुख्यमंत्री