मुंबई: अहमदाबाद येथे घडलेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने गुरुवारचा राज्यव्यापी मशाल मोर्चा स्थगित केला आहे. याशिवाय काँग्रेसच्या वतीने पुढील तीन दिवस दुखवटा पाळला जाणार आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने गुरुवारी याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात मशाल मोर्चाचे आयोजन आले होते.
मात्र, अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. विमान अपघातातील मृतांना काँग्रेसने श्रद्धांजली वाहिली असून पुढील तीन दिवस दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. सांबरे हे आज संध्याकाळी ठाण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार होते.