मुंबई : संख्याबळाच्या आधारे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी दावा केला जाणार आहे. प्रस्थापित नेत्यांऐवजी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची पक्षात योजना आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले. या आधारेच ४५ आमदार असलेल्या काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्र पक्षांशी चर्चा करूनच काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे इच्छुक होते. पण तिन्ही प्रस्थापित नेत्यांना विरोधी पक्षनेतेपदावर संधी दिली जाणार नाही, असे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्राने सूचित केले. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर विदर्भातील विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली होती. माजी मंत्री नितीन राऊत यांचेही नाव चर्चेत आहे. जातीचे व विभागाचे समीकरण लक्षात घेऊच मग विरोधी पक्षनेतेपदाचे नाव निश्चित केले जाईल. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी राज्यातील विविध नेत्यांशी चर्चा केली आहे. नवी दिल्लीतून नाव प्राप्त झाल्यावर मगच विधानसभा अध्यक्षांकडे दावा केला जाईल.