मुंबई : राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. करोना चाचण्या करणाऱ्यांपैकी बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाणही गेल्या महिन्यांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत करोना चाचण्यांपैकी बाधित अहवाल येण्याचा दर ०.५३ टक्के होता. तोच दर मागील आठवड्यामध्ये ३.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात इन्फ्ल्यूएंजा तसेच इतर संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येतही हळूहळू वाढ होताना दिसत आहे. कराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारकडून करोना चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात सध्या दररोज सरासरी ५ हजार ८८२ प्रयोगशाळा चाचण्या करण्यात येत आहेत. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन असलेल्या करोना रुग्णांची संख्या १४८९ इतकी झाली आहे. मागील महिन्यांत ही संख्या ७०० च्या घरात होती.

हेही वाचा – काँग्रेसचे राज्यभर आंदोलन, अशा कारवाईला घाबरत नाही;  पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात सर्वाधिक बधितांचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबारमध्ये कराेना चाचण्यांपैकी बधितांचे प्रमाण २० टक्के आहे. त्याखालोखाल पुणे ९.२ टक्के, औरंगाबाद ९ टक्के, कोल्हापूर ८.७ टक्के, नगर ८.४ टक्के, सांगली ७.८ टक्के आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबईतल्या साकीनाका भागात भीषण आग, अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणल्यावरही भडका

रुग्णांचे प्रमाण वाढत असलेले जिल्हे

नंदुरबार : २० टक्के
पुणे : ९.२ टक्के
औरंगाबाद : ९ टक्के
कोल्हापूर : ८.७ टक्के
अहमदनगर : ८.४ टक्के
सांगली : ७.८