छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्री सुटणारी सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस बुधवारी रात्री काही आमदारांच्या गोंधळामुळे सुमारे ५३ मिनिटे रखडली असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) सूत्रांकडून सांगण्यात आले.
या गाडीला आमदारांसाठी विशेष वातानुकूलित डबा जोडण्यात आला होता. मात्र एका महिला आमदाराला या डब्यात बाजूचा (साईड) बर्थ मिळाला. तसेच आमदारांसाठी असलेल्या या डब्यात आमदारांच्या तिकिटावर काही अन्य प्रवासी प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्याने काही आमदारांनी ही गाडी रखडवून ठेवली. हा गोंधळ निस्तरल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून गाडी रवाना करण्यात आल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्री ९ वाजून दहा मिनिटांनी ही गाडी सुटते. मात्र आमदारांच्या गोंधळामुळे ही गाडी जवळपास सुमारे एक तास उशिरा सुटली. देवगिरी एक्स्प्रेसच्या मागे-पुढे असलेल्या लांब पल्ल्याच्या अन्य काही गाडय़ा या गोंधळात पुढे काढण्यात आल्या मात्र हुसेन सागर एक्स्प्रेस या मुळे तिच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा सुटल्याचे सूत्रांनी सांगितले. या गोंधळामुळे अप जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ांच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम झाला.