मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; आठव्या थिएटर ऑलिम्पिकची सांगता

महाराष्ट्र आणि मुंबई ही भारतीय नाटय़सृष्टीची जन्मभूमी असून मराठी रंगभूमीला जवळपास पावणे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले ‘एकच प्याला’ हे नाटक शंभर वर्षे उलटली तरी आजही मराठी रसिकांच्या मनात आहे. सध्याच्या काळात कृत्रिम भावभावना/ आभासी जग (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वाढत असले तरीही मानवी संवेदना जागृत करणारे नाटक ही अजरामर कला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केले.

एल्फिस्टन येथील कामगार क्रिडा स्टेडिअममध्ये आयोजित आठव्या थिएटर ऑलिम्पिक्सच्या सांगता सोहळ्याते ते बोलत होते. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री  महेश शर्मा, अभिनेते नाना पाटेकर, नवाजउद्दीन सिद्दकी, आंतरराष्ट्रीय थिएटर ऑफ ऑलिम्पिक्स समितीचे अध्यक्ष आणि थिएटर ऑलिम्पिक्स संकल्पनेचे प्रणेते ग्रीक नाटय़ दिग्दर्शक थिओडोरस तेझरेपाऊलस, आंतरराष्ट्रीय थिएटर ऑफ ऑलिम्पिक्स समितीचे कार्यकारी सदस्य आणि मणिपूरचे विख्यात रंगकर्मी  रतन थिय्याम, राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे अध्यक्ष अर्जुन देवो चरण आणि राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे यावेळी उपस्थित होते. राजकारणही एक रंगभूमी असून इथे कोणी खरे तर कोणी खोटे नाटक सादर करतात. मात्र मतदार खूप हुशार असून खोटय़ा नाटकवाल्यांना  ते बरोबर ओळखतात आणि खऱ्या नाटकवाल्यानाच निवडून देतात, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

भारत हा विविधतेने नटलेला देश असून इथली संस्कृती, कला, इतिहास विविधतेला बांधून ठेवणारा आहे. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही देशामध्ये ही विविधता टिकून असल्याचे मत केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केले. संध्या पुरेचा यांच्या नटराज वंदना या नृत्याने सोहळ्याची सुरुवात झाली. ओडिसा, आसाम, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यातील कलावंताचे लोकनृत्य, नाना पाटेकर यांनी सादर केलेले ‘नटसम्राट’ मधील ‘जगावे की मरावे’ हे स्वगत, अपंग कलावंतानी व्हीलचेअरवर बसून सादर केलेला नृत्याविष्कार, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्या यांचे सादरीकरण या वेळी झाले.