मुंबई : मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत असून नवी मुंबईतही एक मार्गिका कार्यान्वित आहे. आता ठाणे जिल्ह्यातही लवकरच पहिली मेट्रो मार्गिका कार्यान्वित होणार आहे. ‘दहिसर ते मिरा – भाईंदर – उत्तन मेट्रो ९’ मार्गिकेवरील दहिसर – काशीगाव दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील तांत्रिक चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. चाचण्या आणि पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यानंतर डिसेंबरअखेरीस या पहिल्या टप्प्याचे संचलन करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे.

डिसेंबरअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे शहरातील ही पहिली मेट्रो ठरणार असून मिरा – भाईंदरवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरे थेट मिरा – भाईंदरशी जोडली जाऊन प्रवास अतिजलद होणार असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असा दावा यानिमित्ताने एमएमआरडीएकडून केला जात आहे.

एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील १३.६ किमीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेचे दोन टप्प्यात काम केले जात असून दहिसर – काशीगाव दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे ९६ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तर विविध यंत्रणेचे, सिग्नलिंग, वीजपुरवठा आणि इतर प्रणालींचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्यास एमएमआरडीएने वेग दिला असून बुधवारी हा टप्पा प्रत्यक्ष वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा कामाला एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी १२.३० वाजता मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात झाली. यावेळी काशीगाव – दहिसर दरम्यान मेट्रो धावली. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोतून प्रवास केला.

दहिसर – काशीगावदरम्यान आता मेट्रो गाड्यांसह विविध यंत्रणेच्या, प्रणालीच्या चाचण्या सुरू राहतील. तर दुसरीकडे उर्वरित काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन डिसेंबरअखेर पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. असे झाल्यास वाहतूक सेवेत दाखल होणारी ठाणे जिल्ह्यातील ही पहिली मेट्रो असणार आहे.

एमएमआरमध्ये मेट्रोचे जाळे २०२८ पर्यंत निर्माण होईल – मुख्यमंत्री

सध्या मुंबईत चार मेट्रो मार्गिका कार्यान्वित आहेत. मेट्रो ९ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या चाचणीस आज सुरुवात करण्यात आली आहे. हा पहिला टप्पा वर्षाअखेरीस वाहतूक सेवेत दाखल होईल. तर या वर्षभरात ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि त्यानंतर ५० किमी असे मेट्रोचे जाळे पूर्ण करण्यात येईल आणि नागरिकांना मेट्रोसारख्या अत्याधुनिक अतिजलद वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करू – एकनाथ शिंदे

आम्ही तिघे एकत्रित असून आमची विकासाची एक्स्प्रेस सुरू असून त्यामध्ये आता कोणीही स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. स्पीड ब्रेकरला इथे जागा नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. तर दुसरीकडे स्थगिती सरकारमुळे मेट्रोच्या कामाला ब्रेक लागला होता. पण महायुतीच्या काळात कामे वेगात सुरू आहेत. आम्ही तिघे सोबत असून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही कामे करीत आहोत आणि करत राहू, असे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.