मुंबई : रेल्वे रूळाला गेलेला तडा शोधणे, आपत्कालीन ब्रेक लावून प्रवाशाचे प्राण वाचवणे, जनरेटर कारमध्ये आगसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे, मालगाडीमधील बिघाड अशा विविध दुर्घटना सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे टळतात. या कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांचे प्राण वातचात आणि रेल्वेचे नुकसानही टळते. मध्य आणि पश्चिम रेल्वेने अशा कर्तव्यदक्ष २६ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार देऊन गौरविले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी मुंबई विभागातील ६, पुणे विभागातील ३, भुसावळ विभागातील २ आणि नागपूर विभागातील एका कर्मचाऱ्याला सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले. कर्तव्यादरम्यान सतर्कता दाखवून संभाव्य अपघात टाळण्यामध्ये आणि रेल्वे सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, गौरव प्रमाणपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्र व दोन हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मुंबई विभागातील पनवेल येथील वरिष्ठ लोकल व्यवस्थापक विक्की कुमार वसई – दिवा मेमूवर कर्तव्यावर होते. मेमू खारबाव – भिवंडी रोड भागात येताच शेजारी जाणाऱ्या मालगाडीतून येणारा असामान्य आवाज आणि धूळ पाहून त्यांनी तत्काळ धोका ओळखला आणि सिग्नल दाखवून मालगाडीच्या ट्रेन मॅनेजरला सतर्क केले. मालगाडी थांबवून तपासणी केली असता डबे रुळावरून घसरल्याचे आढळले. विक्की कुमार यांची तत्परता आणि दक्षतेमुळे मोठा अपघात टळला. कुर्ला कारशेडमधील मास्टर क्राफ्ट्समन चांगदेव डुंगे यांच्या वाशी लोकल युनिटचे पॅन्टोग्राफचे पॅन तुटल्याचे व लोंबकळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित डबा वेगळा केला आणि संभाव्य दुर्घटना टाळली. विद्याविहार येथील ट्रॅक मेंटेनर चंदन कुमार कर्तव्यावर असताना विद्याविहार – घाटकोपरदरम्यान डायमंड क्रॉसिंगवर तडे गेल्याचे दिसताच त्यांनी त्वरित खबरदारी घेतली व सर्व संबंधितांना माहिती दिली. त्यामुळे मोठा अपघात टळला.

कुर्ला येथील सहाय्यक लोको पायलट मित्तल गडलिंग दादर यार्डमध्ये शंटिंग इंजिन स्वीकारताना सुमारे १० मीटरचा कॅटेनेरी वायर कॉन्टॅक्ट वायरवर लोंबकळत असल्याचे त्यांनी पाहिले आणि त्वरित संबंधितांना माहिती दिली. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. इगतपुरी येथील मास्टर क्राफ्ट्समन संदीप भालशंकर ब्रेक पॉवर तपासणीदरम्यान मालगाडीच्या एका डब्यात बिघाड झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी संबंधितांना सूचित केले आणि त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे संभाव्य अपघात टळला. कळंबोली येथील कनिष्ठ अभियंता निलेश शिंदे यांना मालगाडी तपासणीदरम्यान एक चाक नादुरुस्त असल्याचे आढळले. शिंदे यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेने सुरक्षेसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल १४ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये वडोदरा विभागातील ४, भावनगर विभागातील तीन, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, रतलाम या विभागांतील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना आणि राजकोट विभागातील एका कर्मचाऱ्याला महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी पुरस्कार विजेत्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.