मुंबई : नवी मुंबई परिसरात सोनेरी कोल्ह्यांचा वावर दिवसेंदिवस वाढताना दिसत असून परिसरातील काही ठराविक ठिकाणी पाणथळ आणि कांदळवन क्षेत्र असल्याने तेथे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आहे. काही दिवसांपूर्वी खारघर परिसरात तर काही दिवसांपासून नेरुळ येथील डीपीएस तलाव परिसरात सोनेरी कोल्हे दिसत आहेत. त्यामुळे सोनेरी कोल्ह्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.

नवी मुंबई परिसरत पाणथळ जागा आणि कांदळवन क्षेत्रासाठी ओळखला जातो. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. असे असले तरी आजही तेथे काही वन्यप्रजाती वाढत असून या प्रजाती शहरीकरणाला तोंड देत तग धरुन आहेत. त्यापैकीच एक दुर्मीळ असा सोनेरी कोल्हा. आजही नवी मुंबईतील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हा आढळतो. कांदळवन हा या कोल्ह्यासाठी सुरक्षित अधिवास आहे. मात्र, याबाबत अजूनही संरक्षण आणि संवर्धन उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नेरुळ येथील डीपीएस तलाव परिसराजवळ सोनेरी कोल्हे दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी आशुतोष केळकर यांनी परिसरातील कोल्ह्याची छायाचित्रे टिपली आहेत.सोनेरी कोल्ह्यांस एकदा का त्यांच्या अधिवासाबाहेर यायची सवय लागली तर ते मानव तसेच इतर प्राण्यांसाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळे रेबीजचा संभाव्य धोका असते. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे एकत्र वावरताना आढळून आले होते. यामुळे कोल्हा आणि कुत्रा यांच्या संकरातून नवी प्रजाती जन्माला येण्याचा धोका आहे. असे झाल्यास ते सर्वांसाठीच घातक ठरु शकते. दरम्यान, नवी मुंबईतील खारफुटी क्षेत्रांवर भूमाफिया अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे याकडे सरकारने अधिक लक्ष देण्याचे मत तेथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले आहे.

रेबीजमुळे कोल्ह्याचा मृत्यू

मुंबईमध्ये रेबीजची लागण होऊन तीन कोल्ह्यांचा मृत्यू झाला होता. चेंबूर परिसरात ही घटना घडली होती. मुंबईत रेबीजमुळे वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची पहिली घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. त्यानंतर काही दिवसांच्या कालावधीने पुन्हा दोन कोल्ह्यांचा मृत्यू रेबीजमुळे झाला होता. तसेच याच परिसरात एका कोल्ह्याने लहान मुलावरही हल्ला केला होता. या कोल्ह्यालाोदखील रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीपीएस तलावासह संपूर्ण परिसराला राखीव घोषित केेले पाहिजे. कारण आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा कांदळवन क्षेत्र आहे. त्यामुळे या जागेचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.-सुनील अग्रवाल, सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्न्मेंट