खुलताबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (१७ जून) भेट दिली होती. या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आंबेडकरांवर निशाणा साधला होता. आंबेडकर सध्या ठाकरे गटाचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे आंबेडकरांनी केलेल्या या कृतीवर ठाकरेंनी प्रतिक्रिया द्यावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होती. परंतु, ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांनाच जाब विचारात “जिन्नाहच्या कबरीवर आडवाणींनी डोकं का टेकलं होतं” असा प्रतिप्रश्न विचारला होता. यावरून वाद आता शमत नाही तोवर मुंबईतील माहिम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा औरंगजेबासोबत फोटो छापक बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
गेल्या काही दिवासंपासून औरंगजेबावरून राज्यातील वातावरण तापले आहे. औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे कोल्हापुरात दंगलही उसळली. दंगलीमुळे कोल्हापूर दोन दिवस अशांत होते. हे प्रकरण शमत नाही तोवर प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन तिथे फुलं वाहिली. या प्रकरणावरून राज्यात मोठा गदारोळ झाला. आता मुंबईतील माहिममध्येही ठाकरे आणि आंबेडकरांचा फोटो औरंगजेबासोबत एकत्र करून त्याचे होर्डिंग लावण्यात आले आहे.
हेही वाचा >> औरंगजेब वाद : जिन्नाहच्या कबरीवर आडवाणींनी डोकं का टेकलं होतं? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
“हे पोस्टर रात्री लावण्यात आले होते. ते कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हे होर्डिंग्स आता काढण्यात आले आहेत. याबाबत अद्याप एकही तक्रार आलेली नाही. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल केला जाईल”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे.
बॅनरवर नेमकं काय?
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांचा हात मिळवताना या बॅनरवर फोटो छापण्यात आला आहे. या दोघांच्याही मागे औरंगजेबाचाही फोटो लावण्यात आला आहे. फोटोशिवाय बॅनरवर कॅप्शनही आहे. “औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे” असं लिहित खाली ‘शिवरायांची जनता’ असं लिहिलं आहे. तसंच, #uddhavthackerayforaurangazeb असा हॅशटॅगही दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे शिबिर खुलताबाद येथे घेण्यात आले होते. या शिबिरानंतर जरजरी बक्षचा दर्गा आणि औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षित स्मारकास प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. काही महिन्यांपूर्वी एमआयएमचे अकबरोद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भेट दिली होती. त्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही भेट दिली. “इतिहास असतो तो पुसता येत नाही’, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले होते. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी भद्रा मारुतीच्या मंदिरासही भेट दिली. अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्थळांना भेटी दिल्या असून प्रत्येकाचा सन्मान राखला जावा, अशी भूमिका त्यांनी या भेटींनतर व्यक्त केली.
ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय?
२० जून रोजी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांवर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. परंतु ते म्हणाले, “जेव्हा आमची युती (शिवसेना-भाजपा) होती. तेव्हा लालकृष्ण अडवाणी साहेब (भाजपाचे ज्येष्ठ नेते) जिन्नाहच्या (मोहम्मद अली जिन्नाह) कबरीवर गेले होते. तसेच नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले पंतप्रधान केक खायला गेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. मला असं वाटतं, लोकांना आता इतिहासात अडकवून ठेवण्यााऐवजी नव्या विचारांसह पुढं जावं.”