आम्ही पाकिस्तानला नाही, बेळगावला जाण्याची परवानगी मागत आहोत. बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील बेळगावसंबंधी कोर्टाचा निर्णय येत नाही, तो पर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत गुरुवारी बेळगावमध्ये आले होते. त्यावेळी एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी ही मागणी केली.

बेळगाव आणि अन्य सीमावर्ती भागातील लोकांवर जेव्हा अन्याय होईल तेव्हा त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटलेले पाहायला मिळतील. काश्मीर, कावेरी, सतलज आणि बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू अशी आक्रमक भाषा राऊत यांनी केली.

बेळगावमध्ये बहुसंख्य मराठीभाषिक जनता असून इथे राहणाऱ्या लोकांना महाराष्ट्रात यायचे आहे. पण सध्या बेळगाव कर्नाटक सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. शिवसेनेने पक्ष स्थापनेपासून बेळगावच्या मुद्दा लावून धरला आहे. शिवसेनेने बेळगाववरुन अनेक आंदोलनेही केली आहेत. सध्या बेळगावचा विषय कोर्टामध्ये आहे. कर्नाटक सरकारने आतापर्यंत अनेकवेळा बेळगावमधील मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.