लोकलमधील महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून मध्य आणि पश्चिम रेल्वेतून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांकडे अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. २०१७ पासून आतापर्यंत ५४७ महिला प्रवाशांनी विनयभंग झाल्याची तक्रार लोहमार्ग पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणांमध्ये आरोपींनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अनेक महिला विनयभंग झाल्यानंतर तक्रार करण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>कोणत्या युक्तिवादाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली? वाचा…

करोनाकाळापूर्वी दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण ७५ ते ८० लाख इतकी होती. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या १५ ते २० टक्के होती. करोनामुळे टाळेबंदी लागू झाली आणि सर्व कारभार ठप्प झाला होता. मात्र अत्यवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली. त्यानंतर हळूहळू अटीसापेक्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलचे दरवाजे उघडण्यात आले. करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे आता लोकलच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी करोनापूर्व काळाच्या तुलनेत प्रवासीसंख्या २० लाखांनी कमी आहे. सध्या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना विविध गुन्हेगारी स्वरुपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. फलाट, पादचारीपूल व लोकलगाड्यांना असलेल्या गर्दीतून प्रवास करताना महिलांना विनयभंग, छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. महिलांविषयक गुन्ह्यांबाबत लोहमार्ग पोलिसांकडे सर्वाधिक नोंद होत आहे.

हेही वाचा >>> “शिवसेना आणि शिवाजी पार्क हे नातं….”; दसरा मेळाव्याच्या परवानगीनंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

२०१७ पासून आतापर्यंत मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गांवर एकूण ५४७ विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. या स्वरुपाचे २०१७ मध्ये ९७ गुन्हे दाखल होते. त्यानंतर २०१८ मध्ये १५७ आणि २०१९ मध्ये १५० गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० आणि २०२१ मध्ये करोना आणि त्यामुळे लागू झालेले निर्बंध यामुळे प्रवासावर बरीच बंधने आली आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. अनुक्रमे ५० आणि ३६ गुन्हे दाखल झाले होते, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. आता यात काहीशी वाढ झाली असून ऑगस्ट २०२२ पर्यंत ५७7 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०१७ पासून ऑगस्ट २०२२ पर्यंत दाखल गुन्ह्यांपैकी ५१० गुन्ह्यांची उकल झाली आहे. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्वरित आरोपींचीही धरपकड केली असून एकूण ५३४ जणांना अटक केल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱयांनी दिली.

हेही वाचा >>>भारतात घातपात घडविण्याची व्हिडिओ कॉलवरून धमकी ; सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिला प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक
महिला प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करण्यात आला आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या वाडीबंदर येथील मुख्यालयातील नियंत्रण कक्षात हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यात येते. महिलांना नियंत्रण कक्षात तक्रार करता यावी याण्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२३७५९२०१ उपलब्ध करण्यात आला आहेत. तसेच तात्काळ सेवेसाठी १५१२ क्रमांकाची हेल्पलाईन आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९५९४८९९९९१ कार्यान्वित आहेत.

लोहमार्ग पोलिसांचे कमी मनुष्यबळ
सध्या लोहमार्ग पोलिसांची ७७१ पदे रिक्त आहेत. एकूण ३७८० मंजूर पदे असून त्यापैकी ३००९ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस शिपाईयांची ६५७ आणि पोलीस नाईक यांची १०३ पदे रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incidents of molestation of women in railway stations are a headache for railways mumbai print news amy
First published on: 23-09-2022 at 17:58 IST