मुंबई : मुंबई महानगर प्रदेश जागतिक शिक्षणाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण परदेशी विद्यापीठांमार्फत सुरू करण्यासंदर्भात २००४ पासून विचार सुरू होता. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ते शक्य झाले. त्यातूनच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिली शिक्षण नगरी नवी मुंबईमध्ये २५० एकरात साकारण्यात येत आहे. त्यात आता जगातील पाच नामवंत विद्यापीठे आली असून पुढील काही दिवसांत आणखी पाच जागतिक विद्यापीठे स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

‘मुंबई रायझिंग- क्रीएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईमध्ये जागतिक स्तरावरील पाच विद्यापीठे स्थापन करण्यात येणार असून त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी इरादापत्र देण्यात आले. या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे पहिले शैक्षणिक संकुल मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

या विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखला जाईल. मुंबईची सध्या वित्तीय, औद्याोगिक आणि मनोरंजन उद्याोगाचे शहर म्हणून ओळख आहे. आता शैक्षणिक शहर अशी ओळख होईल. या परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी साकारण्यात येणार आहे. भारतातील अनेक हुशार तरुणांना आर्थिकदृष्ट्या परदेशातून जाऊन शिक्षण घेणे परवडत नाही. त्यांना त्यांच्या स्वप्नाला मुरड घालावी लागते. मात्र या विद्यापीठांमुळे परदेशाच्या तुलनेत अवघ्या २५ टक्के खर्चात शिक्षण घेणे शक्य होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

कोणती विद्यापीठे?

●संशोधनाला प्राधान्य देणारे इंग्लंडमधील यॉर्क विद्यापीठ

●तंत्रज्ञान व संशोधनासाठी नामांकित अमेरिकेतील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

●रचनाशास्त्रातील (डिझाईन) नामांकित इटलीतील इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (आईडी)

●आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या १०० विद्यापीठांच्या यादीतील ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ

●जगातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक स्कॉटलंडमधील अॅबर्डीन विद्यापीठ

शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय प्रधान

आगामी कालावधीत मुंबई येथे शिक्षण नगरी स्थापन होण्यासाठी पाच परदेशी विद्यापीठांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापीठांनाही आपल्या संस्था भारतात सुरू करता येणार आहेत. त्याचबरोबर भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये आपल्या शाखा उघडता येणे शक्य झाले आहे. भारतातील आयआयटी मद्रासने आफ्रिकेमध्ये केंद्र सुरू केले आहे. आयआयटी दिल्लीने अबुधाबीमध्ये, आयआयएम अहमदाबाद आणि सिम्बॉयसिसने दुबईमध्ये आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. आतापर्यंत भारतात ९ परदेशी विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.