कुलदीप घायवट
‘तळय़ाकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड..’
या श्रीधर शनवारे लिखित कवितेच्या ओळी.
धीवराचे समर्पक वर्णन करणारी ही कविता. धीवर पक्ष्यांच्या आकर्षक रंगामुळे, वैशिष्टय़पूर्ण शरीररचना आणि भक्ष्याची शिकार करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे साहित्यप्रेमींच्या अगदी जवळचा पक्षी म्हणून ओळखला जातो. धीवरला इंग्रजीत ‘किंगफिशर’ म्हणतात. या पक्ष्याचे नाव विविध भागातील बोलीभाषेप्रमाणे बदलते. अनेक भागांत चिमणीच्या आकाराच्या धीवरला खंडय़ा, तर त्यापेक्षा मोठा असलेल्या धीवरला बंडय़ा म्हटले जाते. काही भागात बंडू, किलकिल्या या नावाने ओळखले जाते. अशा नावांमुळे या पक्ष्याबाबत गोंधळही होतो. राज्यात आढळणाऱ्या सर्व पक्ष्यांच्या प्रमाण मराठी नावांची यादी बीएनएचएस व महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेने प्रकाशित केली आहे. धीवर पक्षी प्रामुख्याने ‘अॅल्सिडीनिडी’ या पक्षीकुळातील मासे खाणाऱ्या गटात मोडतो. धीवर म्हणजे मासे पकडणारा, कोळी लोकांनाही धीवर म्हणतात. त्यामुळे माशांची शिकार करणारा पक्षी असल्याने धीवर हे नाव देण्यात आले आहे.
धीवर पक्ष्याच्या जगभरात सुमारे ९० जाती असून बहुतांशी उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. त्यांच्या आकारात आणि रंगात विविधता दिसून येते. भारतात पाच ते सहा जाती आढळून येतात. धीवर चिमणीपेक्षा किंचित मोठा असून त्याच्या शरीराची लांबी सुमारे १८ सेंमी असते. डोक्याचा वरचा भाग निळा व त्यावर आडव्या काळय़ा रेषा असतात. पाठ निळी व पंख हिरवट निळे असतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर विटकरी, निळा आणि पांढरा रंग असतो. गळा पांढरा आणि पोटाकडील भाग विटकरी असतो. चोच लांब, जाड, काळी व टोकदार असते. पाय आखूड व लाल रंगाचे असतात. शेपूट आखूड असते. मुंबईतील सर्व पाणथळ जागी, तलावाच्या काठी, बागांमध्ये, गर्द झाडीत आकर्षक निळे-विटकरी किंवा चकाकत्या जांभळय़ा रंगाचे धीवर दिसून येतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठय़ा संख्येने धीवर आहेत. धीवर पक्ष्याचे आवडते भक्ष्य म्हणजे मासे. त्यामुळेच नदी, ओढे, तळी यांच्या काठी तो हमखास दिसतो. मासे पकडण्याची त्याची पद्धत विलक्षण असते. झाडाच्या एखाद्या फांदीवर किंवा झुडपात बसून तो भक्ष्य टेहळीत असतो. मधूनमधून डोके हलवीत ‘क्लिक्’, ‘क्लिक्’ किंवा ‘किल्’, ‘किल्’ असा आवाज काढतो. पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्टय़ आहे. तसेच कीटक, खेकडे व बेडकांची पिले तो खातो. हवेत उडणारे कीटकही मोठय़ा चपळाईने पकडतो. धीवराचा मार्चपासून ते जूनपर्यंत विणीचा काळ असतो. जलाशयाच्या काठी, पाणथळ भागाच्या उतारावर मातीत खड्डा करून घरटे केले जाते. अंडी उबविण्याचे, पिल्लांना मोठे करण्याचे काम नर आणि मादी दोघे मिळून करतात. मुंबईतील अनेक जलाशयात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे पूर्वी किनाऱ्यावर मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या माशांचे प्रमाण आता अत्यंत कमी झाले आहे. तसेच तलावांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अत्याधुनिकरण केले जात असल्याने धीवराचा अधिवास कमी होऊ लागला आहे.