भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका घोटाळा प्रकरणी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच मुंबई पोलिसांना पुराव्यांसह १०० पानी निवेदन सादर केल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे या नेत्यांची नावं घेत या मोहिमेला त्यांचाही पाठिंबा असल्याचं म्हटलं. तसेच उद्या (१५ एप्रिल) ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशाराही दिला. ते गुरुवारी (१४ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर मागे देखील माझे प्रतिनिधी गेले होते. नियमाप्रमाणे तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी चौकशीसाठी जाऊ शकतात. बुधवारी (१३ एप्रिल) माझ्या प्रतिनिधीने माझं पुराव्यासह १०० पानी निवेदन पोलिसांना दिलं आहे. आम्ही तपास यंत्रणांना आदर देतच आहोत. मी विक्रांतचं अभियान १९९७-९८ मध्ये सुरू केलं होतं. डॉ. नितू मांडके, किरण पैंजणकर यांनी ही मोहिम सुरू केली होती. याला बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला.”

“चर्चगेट स्टेशनवर प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून निधी गोळा केला”

“तत्कालीन सेन-भाजपा सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांनी विक्रांतसाठी ४०-४२ कोटी रुपये राज्य सरकारकडून देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर केंद्र सरकारचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस स्वतः २००३ मध्ये आम्ही भांडुपमध्ये घेतलेल्या ४२ हजार विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धेला आले होते. संसद असो विधानसभा असो अनेकवेळा मी विक्रांतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचाच भाग म्हणून चर्चगेट स्टेशनवर प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून निधी गोळा करण्यात आला होता,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेले पैसे राजभवनात पाठवले”

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “असे कार्यक्रम प्रत्येक पक्ष अनेकदा करतात. यानंतर हे पैसे राजभवनात पाठवले. त्याची चिट्ठी, पत्र आहे. मी राज्यपालांना भेटलो आहे. त्याचे पुरावेही आहेत. एवढंच नाही, तर १० डिसेंबर २०१३ ला कार्यक्रम झाला, १३ डिसेंबरला राज्यपालांना भेटलो, १७ डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपा-शिवसेनेचं प्रतिनिधीमंडळ राष्ट्रपतींना भेटलं. त्यांना देखील आम्ही हे सांगितलं.”

हेही वाचा : “मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की उद्या…”, सोमय्यांचा ठाकरे सरकारला आणखी एक इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“१५ वर्षांत आयएनएस विक्रांत युद्धनौका सडली”

“मुंबई महापालिकेत शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्षांनी महापालिका देखील विक्रांतसाठी पैसे द्यायला तयार आहे असं सांगितलं. आम्ही फक्त एक प्रातिनिधिक कार्यक्रम केला. त्यानंतर २०१४ मध्ये मोदींनी केंद्राच्या सरकारचा कारभार हातात घेतला आणि विक्रांत वाचवण्यासाठी रिपोर्ट मागितला. तेव्हा १५ वर्षांत विक्रांत युद्धनौका सडली होती, खराब झाली होती. त्यामुळे ही युद्धनौका हलवता येणार नव्हती. त्यामुळे विक्रांतचा प्रकल्प बनवता आला नाही. त्याचं आजही आम्हाला दुःख आहे, खंत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.