मुंबई : महाडीबीटी पोर्टल वरील कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख ६७ हजार २२५ लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
विक्रमी संख्येने लाभार्थी निवड झाल्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीतून सावरण्यासाठी या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण या तीन योजना महाडीबीटी पोर्टलवर राज्यात राबविल्या जात आहेत. तसेच २२ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी समृद्धी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देखील कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आजपर्यंत एका वर्षात जास्तीत जास्त सात लाख लाभार्थ्यांची निवड झाली आहे. परंतु, या वेळेस पहिल्यांदाच ३२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची निवड झाली आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, कृषी आयुक्त व सर्व कृषी संचालकांच्या उपस्थित या योजनेसंदर्भात नुकतीच आढावा बैठक झाली होती. त्यावेळेस कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत प्रलंबित अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने व सर्व योजनांमधून उपलब्ध होणारा निधी मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व प्रलंबित अर्जांची निवड करण्याच्या सूचना कृषिमंत्री भरणे यांनी कृषी विभागास दिल्या होत्या. शेतातील कामे करण्यासाठी मजुरांची कमतरता आहे तसेच शेतीतील कामे जलद गतीने होण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मिळावा यासाठी सन २०२५-२६ अंतर्गत वरील तीनही योजनांमधून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्याने या तत्वावर करण्यात आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पावर टिलर, कंबाईन हार्वेस्टर, मनुष्यचलित यंत्रे, ट्रॅक्टर चलित औजारे, फवारणी यंत्रे, औजारे बँक आदींची निवड करण्यात आली आहे.
योजनानिहाय लाभार्थी असे
महाडीबीटी पोर्टलरवरील कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत ३,३८,४८४ लाभार्थ्यांची, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत २९,२६,६१४ लाभार्थ्यांची, राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत २,१२७, अशा एकूण ३२,६७,२२५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याकरीता कुठलाही विशिष्ट दिवसांचा कालावधी दिलेला नाही. कोणताही अर्ज रद्द होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांचा अर्ज आपोआप रद्द होणार नाही. निवड झालेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेतून लाभ घ्यावयाचा नसल्यास त्यांची संमतीपत्र घेऊनच तालुकास्तरावरून अर्ज रद्द करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पूर्वसंमती मिळाल्यानंतर औजारे खरेदी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही भरणे यांनी केले आहे.
योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा कृषी यांत्रिकीकरण योजनांमधून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यांत्रिकीकरणासाठी वरील तीन योजनांव्यतिरीक्त कृषी समृध्दी योजनेतून देखील निधी उपलब्ध होणार आहे. कृषी यंत्रे, औजारांवरील जीएसटी पाच टक्के करण्यात आला आहे, त्याचा ही लाभ घ्यावा, असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.