मुंबई : महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट जास्त जागा मिळाव्यात म्हणून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जागावाटप अंतिम करण्यासाठी आणि उमेदवार निश्चितीसाठी महायुतीचे नेते शनिवारी नवी दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतरच भाजपची राज्यातील उर्वरित उमेदवारांची यादी एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे उमेदवार निश्चिती, महायुतीचे जागावाटप आणि निवडणूक तयारीसह अन्य बाबींसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली. त्यात काही बाबी निश्चित करण्यात आल्या असून शनिवारी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने नितीन गडकरी यांची नागपूरमधून व सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. हेही वाचा >>> शिधावाटप केंद्रांवरील ‘सरकारी साडी’ वाटपाला स्थगिती भंडारा-गोंदियातून खासदार सुनील मेंढे यांना बदलून माजी आमदार डॉ. परिणय फुके यांना तर अमरावतीमधून खासदार नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गडचिरोली-चिमूरमधून खासदार अशोक नेते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रसने दावा केला आहे. ही जागा भाजपने त्यांना सोडल्यास मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महायुतीतील नेत्यांच्या भाजप पक्षश्रेष्ठींशी नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकांमध्ये अंतिम जागावाटप, भाजपच्या उर्वरित जागांची यादी आणि महायुतीत मनसेचा समावेश आदींबाबत शनिवारी किंवा रविवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र त्यात काही अडचणी निर्माण झाल्यास बुधवापर्यंत विलंब होऊ शकतो. त्याआधी विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठीच्या जागांचा निर्णय मात्र एक-दोन दिवसांतच होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. तिढा अद्यापही कायम राष्ट्रवादीने नऊ जागांसाठी आग्रह धरला असला तरी पाच किंवा सहा जागांपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यमान खासदारांच्या १३ जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी ठाण्याची जागा हवी आहे. दोन्ही मित्र पक्षांकडून जादा जागांची मागणी झाल्याने महायुतीतील तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही.