मुंबई : मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात आज (मंगळवारी) विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार,पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आज मुंबईसह, ठाणे, पालघर , रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात ४० – ५० किमी वेगाने वारे वाहतील. याचबरोबर विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मुंबईत दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज
फक्त मुंबईच नव्हे, तर राज्यातील मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचबरोबर मराठवाड्यातही पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात विजा आणि गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे. तसेच नंदूरबार, जळगाव, धुळे भागातही वादळी पावसाचा अंदाज आहे.
वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव.
वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट)
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा.
अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती
अंदमानमध्ये नैर्ऋत्य मोसमी वारे दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमानामध्ये दाखल झाल्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल वेगाने होण्याचे संकेत असून चार ते पाच दिवसांतच मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या काही भागात, तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागापर्यंत धडकण्याची शक्यता आहे.
मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये !
यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवला. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या वर्षी १९ मे रोजी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान-निकोबार बेटांवर धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या आधीच म्हणजेच ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. दरम्यान, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान). यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.