मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून १३ प्रवासी पडले, यापैकी चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्व स्तरातून रेल्वे प्रशासनावर टीका होत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन या अपघाताबाबत चौकशी केली. तसेच मुंबई उपनगरीय लोकलचे स्वतंत्र रेल्वे मंडळ असावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटीहून अधिक आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. एकूण प्रवासी संख्या आणि उपलब्ध सुविधा यात प्रचंड तफावत आहे. परिणामी वेगवेगळ्या घटना घडतात, त्यावर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. परंतु, रेल्वेचा कारभार अद्याप सुधारलेला नाही. मुंबई उपनगरीय लोकलचे स्वतंत्र रेल्वे मंडळ असावे, यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेचे अनेक प्रश्न सुटू शकतील, असे मत नांदगावकर यांनी व्यक्त केले.

लोकल फेऱ्या कमी असून लोकल विलंबाने धावतात. गर्दीच्या वेळी प्रवाशांना दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागतो. तसेच मुंब्रा येथील प्रवासाच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण लोकलला स्वयंचलित दरवाजे लावण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. परंतु, यामुळे प्रवाशांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागेल. प्रवासी लोकलमध्ये गुदमरतील. यावर अभ्यासपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे. मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर चौकशी समिती नियुक्त करावी, या समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुंब्रा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेली मदत आयुष्यभर पुरणार नाही. त्यामुळे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वेमध्ये नोकरी द्यावी. तसेच सीएसएमटी – दिवा आणि दिवा – सीएसएमटी अशी लोकल सेवा सुरू करणे आवश्यक आहे. रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नांदगावकरांनी केली.

रेल्वे प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने विविध मागण्या करण्यात येतात. गर्दी विभाजित करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविण्यात येतात. परंतु, रेल्वेने त्यावर विचार करून, कोणतेही पाऊल उचलले नसेल, तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे स्थानकातील जागा स्टॉलने व्यापली असून प्रवाशांना उभे राहण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील स्टॉल हटवणे आवश्यक आहे. प्रवाशांना अडथला ठरणारे स्टॉल्स तात्काळ हटवावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला.