मुंबई : पावसाळा तोंडावर आला असून मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्गावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर कामे हाती घेतली आहेत. रेल्वे मार्गावर पाणी साचणाच्या ठिकाणांचा व्यापक अभ्यास करून मध्य रेल्वेने अतिरिक्त उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३१ मे २०२५ पर्यंत पूर्वपावसाळी कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पावसाळ्यात रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये यादृष्टीने ही कामे करण्यात येत आहेत.

मध्य रेल्वेच्या नुकताच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई विभागात सुरू असलेल्या पूर्वपावसाळी कामाचे मूल्यांकन केले. मध्य रेल्वेवरील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ३३ संवेदनशील ठिकाणांचा शोध घेण्यात आला असून मुसळधार पावसातही रेल्वे सेवा सुरळीत राहावी यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पाणी उपसा करणारे एकूण ११२ पंप बसवण्याचे नियोजन आहे. त्यात १०० अश्वशक्तीच्या पंपांचा समावेश आहे. ११२ पंपापैकी ४४ पंप मुंबई महापालिकेतर्फे उपलब्ध करण्यात येणार असून उर्वरित ६८ पंप मध्य रेल्वे संवेदनशील ठिकाणी बसवणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याव्यतिरिक्त, पालिका चार संवेदनशील पूरप्रवण विभागात प्रमुख पंपिंग केंद्र उभारत आहे आणि सखल भागात मुसळधार पावसात रेल्वे मार्गावर पाणी साचू नये म्हणून चार फ्लडगेट्स देखील बसवणार आहे.

नाले आणि नाल्याच्या स्वच्छतेचे काम वेगात सुरू आहे. ही कामे पूर्ण करण्याची ३१ मे २०२५ ही अंतिम मुदत असून यावेळेत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात लोकल सेवा विनाव्यतय सुरू राहण्यासाठी, साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची मोठी मदत होणार आहे. पाणी साचत असण्याची शक्यता असलेल्या भागात अतिरिक्त उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. नाले, रेल्वे रूळ, रेल्वे परिसरातील गाळ, घाण, चिखल हटविण्याचे काम सुरू आहे. यासाठी मॅक स्पेशल ट्रेन, जेसीबी, पोकलेन व शेकडो कर्मचारी पूर्वपावसाळी कामामध्ये व्यस्त आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेच्या ट्रॅक्शन वितरण विभागाने संपूर्ण पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, वीज खंडीत झाल्यास पाण्याचा उपसा करणारे पंप सुरू राहावे यासाठी विद्युत विभाग पाच प्रमुख ठिकाणी अतिरिक्त डिझेल जनरेटर (डीजी) संच सज्ज ठेवणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.