मुंबई : घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचचले आहे. ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ एखादा कर्मचारी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात शहर विभागातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामगिरीचा डॉ. अश्विनी जोशी यांनी परळ येथील एफ – दक्षिण विभाग कार्यालयात मंगळवारी आयोजित बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी अश्विनी जोशी म्हणाल्या की, स्वच्छता ही केवळ एखाद्या विशिष्ट अभियानापुरती मर्यादित राहू नये. नियमित आणि जबाबदारीने स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्य करावे. मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागातील प्रत्यक्ष दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी नेमलेले मात्र कायमस्वरूपी गैरहजर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उपायुक्त (परिमंडळ-१) डॉ. संगीता हसनाळे, उपायुक्त प्रशांत सपकाळे, उपायुक्त किरण दिघावकर, शहर विभागातील सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये गैरहजेरीचे प्रमाण मोठे आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी जोशी यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीत आढावा घेतल्यानंतर डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, स्वच्छतेसंदर्भात आयोजित एखाद्या अभियानात मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होत असेल तर नियमितपणे देखील तितक्याच कचऱ्याचे संकलन व्हायला हवे. स्वच्छतेसंदर्भातील अभियानाने प्रोत्साहन मिळत असले तरी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले स्वच्छता कर्मचारी नियमितपणे त्यांची जबाबदारी पार पाडत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून एखादा कर्मचारी कायमस्वरुपी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी. सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आदींनी ‘सचेत’ ॲपचा नियमितपणे वापर करावा. तसेच, संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या भागातील घनकचराविषयक गरजा, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारी ठिकाणे आणि नागरिकांच्या वर्दळीच्या वेळा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार नियोजनासाठी सूक्ष्म आराखडा सादर करावा, असे निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिले.