मुंबई : मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था विकसित झाली असून मुंबई चित्रनगरीचा येत्या चार वर्षात संपूर्णपणे कायापालट करण्यात येईल. चित्रपट क्षेत्रासाठी निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक सुविधांसह चित्रपटनगरीचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.

प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांनी ‘ फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ कार्यक्रमात फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रनगरीच्या विकासासह विविध प्रश्नांना फडणवीस यांनी उत्तरे दिली. चित्रपट निर्मिती क्षेत्रात मुंबईचे महत्त्वपूर्ण स्थान असून येथे चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था विकसित झाली आहे. मुंबई शहरालगत कर्जत, मीरा-भाईंदर अशा अनेक ठिकाणी चित्रीकरणासाठी स्टुडिओ निर्माण झाले आहेत. विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या या चित्रपट उद्योगाला आधुनिक रूप देण्याचे काम येत्या काळात चित्रनगरीच्या माध्यमातून केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

आशयघन व दर्जेदार मराठी चित्रपट आणि मराठी नाटके दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून त्यातील प्रयोगशिलता आणि अभिनव निर्मितीमुळे सक्षम ठरत आहे. मराठी चित्रपटाला चित्रपटगृह न मिळण्याचा काळ मागे पडला असून आता एकाच वेळी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होतात आणि हाउसफुल्ल होतात, असे सांगून नटरंग, सखाराम बाईंडर यासह आताच्या दशावतार या चित्रपटांचा उल्लेख फडणवीस यांनी केला. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी मुंबईत चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. आज पर्यंत असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांनी भावनाप्रधान कथानकातून प्रेक्षकांच्या मनामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य दर्शकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आत्ताच्या पिढीस भावणारे व आवडणारे चित्रपट देण्यासाठी प्रयत्न केले गेल्यास ही पिढी चित्रपटांशी जोडली जाईल.

फडणवीस यांनी मुंबईतील रस्ते, विकास कामे, पोलीस दल, पायाभूत सुविधांची कामे, भुयारी मार्ग, मेट्रो, शहरातील वाहतूक व्यवस्था या अनुषंगाने विविध प्रश्नांची उत्तरे दिली. शहरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर ५९ मिनिटांत शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावर जाता येईल आणि मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे त्यांनी नमूद केले.

नायक चित्रपटामुळे पंचाईत

आपण प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या ‘ नायक ’ चित्रपटामुळे फार प्रभावित झालो होतो. या चित्रपटात अनिल कपूर हे एक दिवस मुख्यमंत्री होतात आणि जनतेची कामे झटपट करतात. त्यामुळे आम्हीही तेवढ्या वेगाने कामे करावीत, अशी नागरिकांची अपेक्षा असते. त्यामुळे आपली पंचाईत होत असल्याचे अनिल कपूर भेटल्यावर त्यांना सांगितल्याचा किस्सा फडणवीस यांनी सांगितला.