ऐन पावसाळय़ात मुंबईकरांचे हाल अटळ; २६ पुलांवरील वाहतुकीला फटका

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेसह सर्वच सरकारी यंत्रणांनी मुंबईतील पुलांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यंत्रणांची ही नियोजनशून्य खबरदारी मुंबईकरांना आणखी संकटात पाडणार आहे. धोकादायक किंवा जर्जर झाल्याचे कारण देत उपनगरातील १२ पूल धोकादायक ठरवून बंद करण्यात आले असून आणखी सात पूल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय आणखी सात धोकादायक पूल गेल्या काही महिन्यांत पाडून टाकण्यात आले आहेत. आधीच मेट्रोच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यातच आता एकापाठोपाठ एक पूल बंद होऊ लागल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बट्टय़ाबोळ झाला आहे. याचा सर्वाधिक त्रास काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळय़ात होऊ शकतो.

जुन्या आणि धोकादायक पुलांबाबत कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा सपाटाच पालिका प्रशासनाने लावला आहे. पालिका प्रशासनाने जबाबदारीतून स्वतला मोकळे केलेले असले तरी या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे मात्र हाल होऊ लागले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता घाटकोपर-अंधेरी जोड रस्त्यावरील पूल, जूहू तारा मार्गावरील पूल हे लागोपाठ अचानक बंद केल्यामुळे या परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या काळात आणखी काही पूल बंद करण्यात येणार असल्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबई ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाडमधील सावित्री पुलाच्या दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेल्यानंतर मुंबईतील सर्व पुलांची तांत्रिक तपासणी करण्यात आली.  त्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील २९६ पुलांच्या सर्वेक्षणासाठी सल्लागारही नेमले होते. त्याचा अहवाल बाहेर आलाच नाही तोपर्यंत अंधेरीच्या गोखले पुलाची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील पुलांचेही सर्वेक्षण करण्यात आले. अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर एकूण ३४४ पुलांच्या सर्वेक्षण कामाने पुन्हा वेग घेतला. आयआयटी, रेल्वे आणि पालिका यांनी मिळून हे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात १४ पूल अतिधोकादायक आढळून आले होते. मात्र हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आणखी १५ पूल धोकादायक आढळून आले आहेत. सर्वेक्षणाचे हे दोन्ही अहवालांची एकाच वेळी तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर एकाचवेळी पूल बंद करण्याची किंवा पाडून टाकण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत रेल्वेवरील पादचारी पूल पाडून टाकण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे केवळ पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र आता रेल्वेवरील उड्डाणपूल, नाल्यावरील पूलही धोकादायक म्हणून बंद केल्यामुळे वाहतूक वळवावी लागत आहे. त्यामुळे शहराचे सगळे नियोजनच बिघडले आहे.

धोकादायक ठरलेले पूल बंद करताना पालिका प्रशासनाने जी काही गुप्तता पाळली आहे त्यामुळे या सगळ्या गोंधळात भर पडते आहे.  पालिकेच्या पूल विभागाने विभाग कार्यालयांना हे पूल बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर पूल बंद करताना स्थानिक नगरसेवक, प्रसार माध्यमांना कोणत्याही सूचना न देता, नागरिकांना पूर्वसूचना न देता पूल बंद केल्यामुळे घाईगर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. हे पूल कधी सुरू होणार याची कोणतीही माहिती पालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे अनिश्चित काळासाठी हे पूल बंद राहणार आहेत.

सुरक्षिततेसाठी निर्णय

‘महापालिकेच्या अखत्यारित एकूण ३४४ पूल आहेत. यापैकी नवीन  पूलवगळता ३०४ पुलांची संरचनात्मक तपासणी सध्या सुरू आहे. या परीक्षणानुसार आतापर्यंत एकूण २९ पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महापालिकेने हे पूल काढून टाकून त्यांच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले आहे. हे पूल तोडल्यामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याची नम्र जाणीव महापालिकेला आहे. परंतु मुंबईकरांची सुरक्षितता ही सर्वोच्च बाब असल्याने हा निर्णय घेतला,’ अशी माहिती पूल खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

शहरातील पुलांची नावेही लवकरच

शहर भागासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराला काळ्या यादीत टाकल्यामुळे शहर भागातील पुलांची नव्याने तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर भागातील ८१ पुलांच्या संरचनात्मक परीक्षणसाठी नवीन संरचनात्मक परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात मे. स्ट्रक्टवेल डिझाइन्स आणि कन्सल्टंट प्रा.लि. यांची नेमणूक करून ३६ पुलांचे परीक्षण करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत धोकादायक आढळलेल्या २९ पुलांपैकी ३ पुलांच्या पुनर्बाधणीचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत, तर ७ पुलांबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ५ पुलांबाबत निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वापरासाठी बंद केलेले पूल

  • हंस भुग्रा मार्ग, पाइपलाइन सव्‍‌र्हिस रोड पूल
  • धोबी घाट, मज्जास नाला पूल
  • वालभट्ट नाला येथील पूल, वालभट्ट रोड, गोरेगांव (पूर्व)
  • विठ्ठल मंदिर, इराणी वाडी येथील पूल, रगडा पाडा
  • एस.व्ही.पी. रोड, कृष्णकुंज बिल्डिंगजवळील पूल
  • आकुर्ली रोड येथील पूल, हनुमाननगर, धर्मराज डेरीजवळ,
  • गांधीनगर, कुरार व्हिलेज पूल
  • पिरामल नाला, लिंक रोड
  • एस.बी.आय. कॉलनी, वैभव को-हौ.सो.लि.
  • रतननगरपासून दौलतनगर पूल
  • लक्ष्मी बाग कल्वर्ट, घाटकोपर
  • नीलकंठ नाल्यावरील पूल, घाटकोपर

येत्या काळात बंद होणारे पूल

  • मेघवाडी नाला, श्यामनगर वाहतूक पूल
  • वांद्रे धारावी रोड पूल
  • प्रेमनगर नाला, एस.व्ही. रोड, बाटा शोरूम, मालाड
  • ओशिवरा नाला, एस.व्ही. रोड
  • १२० फूट लिंक रोड, मालाड
  • फॅक्टरी लेन, बोरिवली
  • कन्नमवारनगर, विक्रोळी (पूर्व) येथील पूल

हे पूल जमीनदोस्त

  • यल्लो गेट पूल
  • महर्षी कर्वे रोड, चंदनवाडी (दक्षिण)
  • महर्षी कर्वे रोड, चंदनवाडी (उत्तर)
  • रमाबाई पाडा गुरुनानकनगर, मुलुंड कॉलनी, मुलुंड (प) येथील वीर संभाजीनगर पूल
  • खैरानी रोडवरील हरी मज्जीद नाल्यावरील पूल
  • संत मुक्ताबाई हॉस्पिटलजवळील बर्वेनगर येथील पूल
  • रेनीसन्स हॉटेलजवळील पूल, पवई