मुंबई : मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून मंत्रालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाला परवानगी नाकारल्याने आता फेरीवाल्यांनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबईतील फेरीवाले आंदोलन करणार आहेत. तसेच, पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे.

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक प्रयत्न केल्यानंतरही ही समस्या पूर्णपणे सोडविण्यात पालिकेला यश आलेले नाही. मात्र, दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर पालिकेची करडी नजर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेने या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असून दररोज संबंधित भागात पालिकेचे कर्मचारी तैनात असतात. पालिकेच्या या कठोर कारवाईमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय थंडावले आहेत. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दादरमध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय करत असून त्यांच्याकडे वैध कागदपत्रे असल्याचा दावा फेरीवाल्यांनी केला आहे. व्यवसायासाठी पात्र असूनही महापालिकेकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून केला जात आहे.

कुटुंब कसे पोसायचे ?

गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे मुलांचे शाळेचे शुल्क, तसेच कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी फेरीवाल्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संयुक्त फेरीवाला महासंघाकडून १५ जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, जोपर्यंत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, तसेच सरकारने लवकरच सर्वांना परवाने द्यावेत, अशी मागणी फेरीवाला संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.

मराठी फेरीवाल्यांच्या हक्काकडे दुर्लक्ष ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादरच्या रस्त्यांवर वर्षानुवर्ष म राठी फेरीवाले व्यवसाय करत आहेत. आमची तिसरी पिढी आता या व्यवसायात उतरली आहे. मात्र, पात्र फेरीवाल्यांवरही पालिका कारवाई करत आहे. पात्र फेरीवाल्यांची पडताळणी आणि योग्य नियोजन केल्यास दादरच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांचा त्रास होणार नाही. मराठी माणसाचा मुद्दा सध्या गाजत असला तरीही मराठी फेरीवाल्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत संयुक्त फेरीवाला महासंघाचे सदस्य महेश कानडे यांनी व्यक्त केली.