मुंबई : येत्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून गणपतीच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात मूळगावी जाणाऱ्या कोकणवासीयांनी एसटी प्रवासाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे एसटीच्या ४,४७९ बस गट आरक्षणासह एकूण ५,१०३ जादा बस आतापर्यंत भरल्या आहेत.

मुंबईतील कोणवासियांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यावर्षी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५,२०० जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील प्रवाशांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून या जादा बस सोडण्यात येणार आहेत.

कोकणवासियांचा प्रवास होणार सुखरूप

गणपती, मुंबईचे कोकणवासीय आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. मुंबईतून कोकणात थेट मूळगावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच कोकणवासीयांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांच्या सेवेसाठी एसटी धावत असते, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रवास सुकर होण्यासाठी विविध उपाययोजना

गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक व बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

एसटीला १३ ते १६ कोटी रुपयांचा तोटा

गणपती विशेष जादा बस चालवण्यासाठी राज्यातील इतर विभागातून बस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे येथील विभागात पाठवण्यात येतात. त्यानंतर या बसचे गट आरक्षण झाल्यानंतर, त्या परतीचा प्रवास करताना रिकाम्या येत होत्या. त्यामुळे महामंडळाचा इंधनावर जादा खर्च होत होता. यातून मार्ग काढण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी ३० टक्के जादा भाडेवाढ केली होती, मात्र या निर्णयाबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द केल्याने, एसटीला १३ ते १६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.