आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे मुंबईमध्ये होणाऱ्या राजकीय बॅनरबाजीवर अंकुश घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईत एकही राजकीय बॅनर झळकू  देणार नाही, असा निर्धार पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच दोन दिवसांमध्ये महापालिकेने शहरातील तब्बल १,४३८ बॅनर्स काढून टाकले आहेत.
निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिका लागल्यामुळे निवडणूक आयोगाकडून शहरातील राजकीय बॅनर्स काढून टाकण्याचे आदेश पालिकेला मिळाले आहेत.
त्यानुसार बुधवारी पालिकेने ३४५ बॅनर्स, १८२ फलक आणि ११० पोस्टर्स, तर गुरुवारी १९३ बॅनर्स, ८४ फलक आणि २४ पोस्टर्स काढून टाकले, अशी माहिती परवाना विभागाचे प्रमुख शरद बांडे यांनी दिली.

पाणथळ जमिनींवरील भराव : देखरेखीसाठी विशेष प्राधिकरण
मुंबई :निवासी इमारतींसाठी वसई आणि ठाणे पट्टय़ातील पाणथळ जमिनी भराव टाकून नष्ट करण्यात येत असल्याचा अहवाल गुरुवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायालयाने त्याची दखल घेताच राज्य सरकारने किनारपट्टी भागांत सीआरझेड नियमांचे उल्लंघन केले जाते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी चार आठवडय़ांत विशेष प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही न्यायालयाला दिली.  निवासी संकुलांसाठी वसई आणि ठाणे पट्टय़ात भराव टाकून मोठय़ा प्रमाणात पाणथळ जमिनी नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप ‘वनशक्ती’ या स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. त्याला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने आवश्यक ते आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

एक्सप्रेसच्या धडकेने दोन गॅंगमनचा मृत्यू
मुंबई :दिवा रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर काम करत असलेल्या दोन गॅंगमनचा तपोवन एक्सप्रेसने धडक दिल्यामुळे बुधवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर गँगमनच्या सुरक्षेसाठी त्वरीत उपाययोजना करावी,अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने दिला आहे.दिवा स्थानकाजवळ बुधवारी रात्री ‘ट्रॅक डाऊन’ झाल्याची माहिती कल्याण येथील कायमस्वरूपी मार्ग निरीक्षक (पीडब्लूआय) विभागाला मिळाली. त्यामुळे  राजाराम संतू मसने (५६) आणि वसंत निवृत्ती सागळे (४६)हे दोघे  दुरूस्तीसाठी घटनास्थली जात होते. त्याचवेळी तपोवन एक्सप्रेसने धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.गेल्या काही महिन्यांत रेल्वेरूळ गँगमनसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. त्यामुळे गॅंगमनच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा,अशी मागणी एनआरएमयूचे महामंत्री वेणु नायर यांनी केली. तर या घटनेची पूर्ण माहिती घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले.

ई-तिकिटांची दलाली करणाऱ्या पाच जणांना अटक
मुंबई: रेल्वेच्या  ई-तिकिटांची दलाली करण्याचे प्रकारही समोर आले असून गुरुवारी मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने धडक कारवाई करून विविध ठिखाणांवरून दलालांना अटक केली आहे. या दलालांकडून जप्त केलेल्या तिकिटांची रक्कम पाच लाखांपेक्षा  अधिक आहे. धारावी येथे मारलेल्या छाप्यात जुम्मन आणि मनोज तिवारी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध आरक्षण केंद्रांवरून काढलेली ३७ ई-तिकिटे आणि सात तिकिटे जप्त करण्यात आली. तर घाटकोपर येथील कृष्णा कम्युनिकेशन्स येथेही अशा प्रकारचा छापा मारला असता के. विश्वकर्मा आणि त्याचे दोन साथीदार बनावट सॉफ्टवेअरच्या आधाराने तिकिटे आरक्षित करत असल्याचे समोर आले. या सर्वाना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.