मुंबई : कुलाबा येथील हॉटेल ताजमध्ये १० ते ११ पाकिस्तानी दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाल्याची घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातही दहशतवादी असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आला. याप्रकरणानंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली. दूरध्वनी करणाऱ्याच शोध घेतला.

साताऱ्यात काही दहशतवादी असून त्यांच्याकडे रडार आहे. खूप मोठे काही तरी घडणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री प्राप्त झाला. रडारच्या माहितीमुळे सर्वच यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी तातडीने गुन्हे शाखा व रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळविण्यात आली. दूरध्वनी करणाऱ्याला ताब्यात घेऊन टिळक नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी संशयीताची चौकशी केली असून त्याच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला होता. सात वर्षांपूर्वी संशयीत व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तेव्हापासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे संशयीत व्यक्तीच्या जावयाने पोलिसांना सांगितले. संशयीत व्यक्ती मुंबईमध्ये बहिणीकडे वास्तव्याला आहे.

हेही वाचा : Video: गोष्ट मुंबईची – मुंबई आणि आदिवासी नेमका संबंध काय? पुरावे कोणते?

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला हॉटेल ताजमध्ये १० ते ११ दहशतवादी शिरल्याचा गुरूवारी दूरध्वनी आला होता. याबाबत कुलाबा पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर तात्काळ बीट मार्शल व त्यांच्या पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने हॉटेलमध्ये जाऊन तेथील सुरक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सर्वांनी मिळून हॉटेलची पूर्णपणे तपासणी केली. पण काहीच आढळले नाही. याप्रकरणानंतर गुन्हे शाखा व इतर यंत्रणांना माहिती देण्यात आली असून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : नऊ वर्षांमध्ये मुंबईत गोळीबाराच्या १६ घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाशिवाय गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तीक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.