मुंबई : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीने (एमआरव्हीसी) सुरू असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) टप्पा तीनच्या रखडलेल्या प्रकल्पांना वेग येण्याची शक्यता आहे. मुंबई प्रकल्पाबाबत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ‘एमयूटीपी ३ अ’च्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १०० कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
‘एमयूटीपी ३ अ’ मधील रेल्वे प्रकल्पांसाठी एकूण ३३ हजार ६९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मार्च २०१९ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर, वेगवान होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आढावा बैठकीत ‘एमयूटीपी ३ अ’च्या प्रकल्पांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल,
असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच, या ‘एमयूटीपी ३ अ’ प्रकल्पासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात यावेत, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले होते. त्यानंतर एमएमआरडीएकडून १०० कोटी रुपये मिळाल्याचे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘एमयूटीपी ३ अ’मधील प्रकल्प कोणते?
कल्याण – बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका (१५ किमी), कल्याण – आसनगाव चौथी मार्गिका (३२ किमी), बोरिवली – विरार पाचवी व सहावी मार्गिका (२६ किमी), त्याचबरोबर गोरेगाव – बोरिवली हार्बर मार्गिकेचा विस्तार (७ किमी), मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानक नूतनीकरण, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टीम’ (सीबीटीसी) यंत्रणा आणि कल्याण यार्ड नूतनीकरण या प्रकल्पांचा समावेश एमयूटीपी ३ अ मध्ये आहे.
पश्चिम रेल्वेवरील सुरक्षेसाठी आणखी २०० जवान
मुंबई : करोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व कारभार पूर्ववत झाले असून पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. तसेच, उन्हाळय़ाच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन, महिलांच्या लोकल डब्यात सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त २०० जवान तैनात करण्यात येणार आहेत. करोनापूर्व काळात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला लोकल डब्यात शेवटच्या लोकलपर्यंत जवान तैनात करण्यात येत होते.